नीलकंठ मोहिते
रेडा – इंदापूर तालुक्यात जवळपास 140 गावे आहेत. यापैकी 70 ते 80 गावांमध्ये आठवडे बाजार भरतो. करोना प्रादुर्भाव असल्यामुळे ग्राहकांना मिळेल तो भाजीपाला लवकर घेऊन घर गाठावे लागते आहे. याचा फायदा घेत आठवडे बाजारातील विक्रेते वजन मापात गोलमाल करत असल्याचे दिसून येत आहे. त्याची झळ गोरगरीब नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.
“जागो ग्राहक जागो’, अशी जाहिरात करून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होत असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ग्राहकांची फसगत होत आहे. अ प्रमाणित वजन-मापे आणि काट्यातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. वैधमापन विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील वजनमापे पासिंगच एक वर्षापासून झाले नसल्याची बाब पुढे आली आहे.
ग्रामीण भागात अनेक दुकानांमध्ये व रस्त्यावरील विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. बऱ्याच दुकानामध्ये काटा पासिंग केलेला नसतो, वजन प्रमाणित नसतात; मात्र ग्राहकांना वस्तू त्याच काट्यावर मोजून दिल्या जातात. नियमाप्रमाणे प्रतिवर्षी वजन काट्यांचे पासिंग करणे आवश्यक असते. त्यासाठीचे प्रमाणपत्र मिळविणे गरजेचे असते. सध्या विविध दुकानदार, मुख्य व्यावसायिक, लहान कारखाने, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, बियाणे व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेते, इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांकडे इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहे.
ग्राहक जागृती कार्यक्रमातून ही प्रक्रिया राबविली जाते; मात्र या कार्यक्रमासाठी शासनाकडून पुरेसे अनुदान मिळत नाही. मात्र, दुकानदारांवर कारवाई करुन आपले वैयक्तिक हितसंबंध खराब का करावे, ही भूमिका अधिकारी घेताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तपासणी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे.
ग्राहकांना मालाचे वजन तंतोतंत मिळावे, म्हणून दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे लावलेले आहेत. मात्र आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे, जे त्यांच्या मनाने वजन करून देतील ते घ्यावेच लागते, अशी गत सर्वसामान्यांची होऊन बसली आहे. आठवडे बाजारादिवशी खेड्यापाड्यातील जनता, खरेदीसाठी बाजारात येतात मात्र, बाजारामध्ये ज्या विक्रेत्यांची दुकाने लावलेले आहेत, यामध्ये काही ठराविक व्यापारी वर्ग सोडला तर एका जवळदेखील पासिंग वजन काटे दिसून येत नाहीत.
बावडा, निमगाव केतकी, शहाजीनगर कारखाना, बिजवडी, लासुर्णे, निमसाखर, निरा नरसिंहपूर, इंदापूर शहर भागात तर हात विक्रेते पासिंग केलेले वजन न वापरताच, दगडाचे गाठोडे करत ग्राहकांना लुटल्याचा आनंद मिळवत आहेत. तर काहीजण लोखंडी नटबोल्ट हे ठोक किलोचे माप आहे. असे म्हणत राजरोसपणे काटा मारण्याचे काम करीत आहेत. अशी विक्रेत्यांकडे तर 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम अशी मापे बघायलाही नाहीत. मात्र वजनाचे दगड वजनासाठी वापरून चक्क फसवणुकीचा धंदा सुरू आहे.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच विभाग काळजी घेत आहे. यामध्ये वैधमापन विभागदेखील शासनाच्या नियमांचे पालन करीत आहे. इंदापूर तालुक्यातील सर्व दुकानदार विक्रेत्यांच्या मोजमाप काटे व मापे प्रमाणित करण्यासाठी, डिसेंबरमध्ये एक विशेष अभियान राबवून सर्व भागातील ग्राहकांना अचूक तंतोतंत माप मिळावे. यासाठी प्रयत्न केला जाईल. ज्या भागामध्ये ग्राहकांना मापामध्ये अचूकता जाणवत नाही. त्यांनी पुणे येथील वरीष्ठ कार्यालयाला ऑनलाइन 020-26137114 या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या तक्रारी दाखल कराव्यात.
– हमीद शेख, वैधमापन अधिकारी इंदापूर
खेळ थांबवा; वजन, मापे प्रमाणित करा –
बाजारात नागरिक फळभाज्यांचे वजनावरुन वाद घालतात. मात्र इतर ग्राहक वाद न करता निघून जातात. त्यामुळे वजन काट्यांचा चुकीचा खेळ बंद करावा तसेच चुकीची वजन मापे वापरणाऱ्या एकाही विक्रेत्यावर कारवाई झालेले उदाहरण तालुक्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे वजनमाप निरीक्षकांनी ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.