शिंदे वासुली -भामा आसखेड (ता. खेड) धरणातून 18 गावांना आणि चाकण एमआयडीसीला जीवन संजीवनी ठरणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्रामपंचायतीकडून पाणी उचलण्याच्या कालमर्यादेत बदल केल्याने संबंधित ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांद्वारे पुरेसे पाणी न मिळाल्याने गावांवर कधी नव्हते ते पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे.
चाकणमधील औद्योगिक असोसिएशनच्या कंपन्यांना पाणीपुरवठा करण्याबरोबरच या जलवाहिन्याच्या मार्गात किंवा चाकण ते करंजविहिरे रस्त्यालगत असणाऱ्या गावांना वाजवी दरात पाणीपुरवठा करण्यासाठीची ही योजना आहे. यामध्ये चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील वासुली, भांबोली, वराळे, आंबेठाण, बिरदवडी, खराबवाडी आदी ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांचा समावेश होतो. गेली 10 ते 12 वर्षांपासून येथील योजना सुरळीत सुरू होत्या; परंतु सध्या प्रत्येक गावात स्थानिक लोकसंख्येच्या तीन ते चार पट लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यास या योजना अपुऱ्या पडत आहेत.
या योजनांची पाणी साठवणूक क्षमता आणि वितरण व्यवस्था मर्यादित स्वरूपाची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे सरासरी 50 हजार लीटर साठवणूक क्षमता आहे. त्यामुळे एमजीपीच्या जलवाहिनीतून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक दिवशी पाणीयोजनेची मोटर 18 ते 20 तास मोटर सुरू ठेवावी लागते. त्यामुळे ग्रामपंचायतींना अधिकचा आर्थिक भार सहन करावा लागतो.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चाकण एमआयडीसी, महाळुंगे कोविड सेंटर, महाळुंगे व खराबवाडी आदी गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. म्हणून या ग्रामपंचायतीसाठी 24 तास सुरू असलेला जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फक्त 12 तासच सुरू ठेवून या कालावधीत संबंधित ग्रामपंचायतीने पाणी उचलण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. याकामी एमजीपीचे कर्मचारी सतत लक्ष ठेवत असून ते कर्मचारी स्वतः 12 तासाने व्हॉल्व्ह बंद करून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद करत असतात.
त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये पुरेसे पाणी संकलित न झाल्याने नाइलाजास्तव पाणीपुरवठा करताना निर्धारित वेळेमध्ये कपात करावी लागते. प्रत्येक गावाला दीड ते दोन लाख लीटर पाणी लागते; परंतु सध्या 12 तासांत फक्त 80 हजार ते 1 लाख लीटरच पाणी मिळते त्यामुळे पुढे दिवसेंदिवस पाणी कपातीची समस्या उग्र रूप धारण करण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
संपूर्ण सावळा गोंधळ
एकीकडे एमजीपी सांगते की, थकबाकीमुळे आणि मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी देता येत नसल्याने जलवाहिनीचे हॉल्व्ह बंद केले जातात. तर कर्मचारी खालच्या भागाला विशेषतः महाळुंगे कोविड सेंटरला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कालमर्यादा कमी केली आहे. यामध्ये विसंगती आढळून येते.
थकबाकीमुळे हॉल्व्ह बंद करत असतील तर मग वैयक्तिक हॉल्व्ह का बंद करतात? असा सवाल उपस्थित होतो. अनेक जण वैयक्तिक जोडचे बिले अदा केली जातात. त्यांच्यावर अन्याय का ? एकंदरीत ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये सुसूत्रता नसून सावळा गोंधळ असल्याचे स्पष्ट होत आहे.
या योजनेवर सुरू असलेल्या ग्रामपंचायतीकडे पाणी बिलांची थकबाकी आहे. सर्वांना वसुलीच्या नोटिसा काढल्या आहेत. पण सर्व ग्रामपंचायतींनी “करोनाचे’ कारण पुढे करत अगदी 10 टक्के ही थकबाकी भरली नाही. शिवाय या सगळ्या पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलतात आणि आतातर पाणी कोटा वाढवून देण्याची मुदतही संपलेली आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना करण्यास जागा उपलब्ध नाही; परंतु संबंधित ग्रामपंचायती जिल्हा परिषदेकडून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करून घेऊ शकतात. नाहीतर चाकण नगरपरिषदेसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. तसे झाल्यास तो पाणीसाठा ग्रामपंचायतीकडे वळवू शकतो. मात्र, ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडची सगळी थकबाकी भरली तरच विचार केला जाईल.
– संजय पाठक, मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण