जिल्ह्यात 747 ग्रामपंचायत रणधुमाळी : इच्छुक उमेदवार लागले कामाला
पुणे – पुणे जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गावाकडे कधीच न फिरकणारे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावविकासाच्या गप्पा मारू लागल्याने सोशल मीडियावर टीकाटिप्पणी होत आहे. दरम्यान, सध्या तरी नेतेमंडळींनी “थांबा आणि पाहा’चे धोरण अवलंबले असले, तरी गाव पातळीवरील इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
या निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. ही निवडणूक याअगोदरच्या निवडणुकीपेक्षा राजकीयदृष्ट्या वेगळी असणार आहे. या अगोदरच्या झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक गावामधून युती, आघाड्या पाहायला मिळाल्या; मात्र सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यावेळच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरील आघाड्या कशा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूक कितपत परिणाम करते? पक्षीय आघाड्या की स्थानिक पातळीवर ग्रामस्तरीय आघाडी होणार का? याकडे लक्ष लागले आहे. यातच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत रद्द करून त्या निवडणुकीनंतर पुन्हा होणार असल्याने गाव कारभाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरपंच होण्यासाठी इच्छुक असलेल्या गाव पुढाऱ्यांनी वॉर्डातील आरक्षण सोडतीनंतरच तयारी सुरू केली होती. सरपंचपदाचे आरक्षण निघाली की जोमाने तयारी सुरू ठेवायचे, असे चित्र प्रत्येक गावात दिसत होते; परंतु सध्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करणाऱ्या भावी सरपंचांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
————–
सोशल मीडियावर टिंगल टवाळी सुरू
ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून सोशल मीडियावर आता वेगवेगळ्या पोस्ट धुमाकूळ घालू लागल्या आहेत. यात मतदारांना जागृत करण्याबरोबरच राजकारणाची टिंगल टवाळी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या तरी मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. या निवडणुकीत करोनाच्या भीतीमुळे प्रत्यक्ष जाऊन प्रचार करण्यापेक्षा सोशल मीडियाचा मोठा वापर होणार असल्याचे चित्र सुरवातीलाच दिसून येत आहे.
ऑनलाइन प्रक्रियेमुळे लागणार कसोटी
गावागावांत इंटरनेटची समस्या उद्भवण्याची शक्यता
ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया यावर्षी प्रथमच संपूर्णपणे ऑनलाइन राबविली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यापासून या प्रक्रियेचा सामना करावा लागेल. प्रत्येक गावात इंटरनेटची सुविधा सक्षमपणे उपलब्ध नसल्याने संभाव्य गावपुढाऱ्यांची निवडणुकीआधीच ऑनलाइन प्रक्रियेत कसोटी लागणार आहे.
नामनिर्देश पत्र, घोषणा पत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आणि लागणारी इतर माहिती वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना स्वतःची नोंदणी करून माहिती भरावी लागणार आहे. यासाठी निवडणुका असलेल्या जिल्ह्यात सेतू, ई-सेवा केंद्र, संग्राम कक्ष आदी जास्त क्षमतेची इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी तसेच सायबर कॅफे अन्य सुविधा केंद्रांवर नामनिर्देशन पत्र भरण्याची सोय उपलब्ध राहणार आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही तेथील इच्छुक उमेदवारांना तालुका मुख्यालयीच धावपळ करावी लागणार आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज हा वेबसाइटवर दिलेल्या नामनिर्देशनपत्राचा नमुना भरून त्याचे प्रिंट आऊट घेऊन त्यावर उमेदवारांना स्वाक्षरी करावी लागेल. स्वाक्षरी केलेली प्रिंट आऊट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत दाखल करावी लागेल.
आजपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार
मागील वेळी पार पडलेल्या काही निवडणुकांमध्ये ऑफलाइन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया होती. यंदा मात्र ही प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाइन स्वरूपात राहणार आहे. बुधवार (दि. 23) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. 15 जानेवारीला मतदान, तर 18 जानेवारीला निकाल घोषित होताच प्रशासकराज निवडणुकीनंतर संपुष्टात येणार आहे.