गावातील रस्ते कचरामय :दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सोरतापवाडी (वार्ताहर) – उरुळी कांचन (ता. हवेली) येथे कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतुन जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग साचले आहेत. या भागात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उरुळी कांचन येथे प्लास्टिक बंदीकरिता अनेक दुकांदारांवर दंडात्मक कारवाइ करण्यात आली होती. या कारवाईनंतर प्लास्टिक कचरा कमी होईल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, अद्याप तसे काही झालेले दिसत नाही. कचऱ्याच्या ढिगात मोठ्याप्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून येत आहे. या परिसरातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक अनेक आजारांनी त्रस्त झाले आहेत. नागरिक रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला बिनधास्त कचरा टाकत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे.
चिकन, मटण, हॉटेल व्यवसायिक दुर्गंधीयुक्त कचरा ओढ्याशेजारी टाकत आहेत. तो तसाच तिथे कुजतो, त्याचे प्रमाण इतके जास्त आहे की, दिवसभरातच ढीग साचत आहेत. हा कचरा दररोज उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. या सडलेल्या पदार्थांचा वास ये – जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. या कचऱ्यावर वावरणारी भटकी कुत्री, डुकरे, पक्षी यांच्यामुळे परिसरात घाण आणि संसर्ग पसरत आहे.
कचरा डासांसारखे कीटक, चिलटे, माशा यांच्या उत्पत्तीसाठी पूरक ठरत आहे. त्यामुळे या भागाला आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. रस्त्याच्या कडेला जागोजागी कचरा साचलेला आहे. संपूर्ण कचरा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
नागरिक हैराण
ग्रामपंचायत नागरिकांकडून सर्व प्रकारचे कर वसुल करते. तरी या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग उचलून त्याची विल्हेवाट लावण्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांच्या मागणीला हरताळ फासला जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. गावात सगळीकडे कचरा असल्याने या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत.