61 लाख 50 हजारांचे नुकसान
तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
वाल्हे – येथील मुख्य बाजारपेठेतील किराणा दुकानासह ब्युटी पार्लर दुकानाला गुरुवार (दि. 2) रात्री आग लागून 61 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. दरम्यान, या आगीत 61 लाख 50 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती वाल्हे (ता. पुरंदर) महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.
किराणा व्यापारी राजकिशोर काबरा व राजगोपाल काबरा यांचे घर, व दुकान वाल्हे येथील मुख्य बाजारपेठेत मागील अनेक वर्षांपासून आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सुरुवातीला पार्लरमधून धूर निघत असल्याचा घराती व्यक्तींच्या लक्षात आले. दरम्यान, यावेळी घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्याने आजूबाचे नागरिक जमा होऊन त्यांनी घरातील व्यक्तींसह गॅस सिलिंडर बाहेर काढले.
दरम्यान, तरुणांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून पाणी मारण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच जेजुरी येथून अग्निशमन दलाची मदत येईपर्यंत गावातील तरुणांनी व नागरिकांनी काबरा यांच्या दुकानात असलेले साहित्य हलविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काबरा यांच्या घराशेजारील इतर काही घरे जुन्या पद्धतीची असल्याने त्या घरांनाही धोका निर्माण झाला होता.
आग आटोक्यात आणण्यासाठी जेजुरी नगरपालिकेचा बंब, नीरा येथील पॉलीकेम कंपनीचा बंब, तसेच सासवड नगरपालिकेचे बंब, तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा, टीटी कंपनीचा पाण्याचा टॅंकर यांच्या साह्याने तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली होती. मात्र, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास, पुन्हा आगीचा भडका उडाला. यादरम्यान, पुन्हा अग्निशामक दलास पाचारण करून आग आटोक्यात आणली.
बाजारपेठेतील रस्ता अरुंद
वाल्हे बाजारपेठेतील रस्ता अरुंद आहे. अनेकांची घरे, दुकाने जुनी असल्याने पूर्वीच्या बैलगाडीच्या रस्त्याची बाजारपेठ आहे. यातच, रस्त्यांच्या दोन्ही बाजूस वाहने लावलेली असतात. रात्रीच्या वेळी अशा अचानक घटना घडल्यास अग्निशामक दलाच्या गाड्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच बाजारपेठेतील महावितरणच्या खांबावर तारांचे जाळे मोठ्या प्रमाणावर झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणे हे तारांचे जाळे काढून अंडरग्राउंड करावे अशी मागणीदेखील ग्रामस्थांमधून होत आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्याने तर मोठे वाहन, दिवसाही घेऊन जाणे जिकिरीचे काम आहे.