सविंदणे – शिरूर तालुक्यातील साईदीप हॉटेलचे चालक अशोक कांदळकर यांना सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी जबर मारहाण करण्यात आली होती. परंतु, दोन महिने उलटूनही अदयाप आरोपींचा शोध लागलेला नाही. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप अशोक कांदळकर यांनी केला आहे.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे साईदीप हॉटेलचे चालक अशोक कांदळकर यांना दोन महिन्यापुर्वी सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी लोखंडी गज व लाकडी दांडक्याने डोक्यात, हातावर, पाठीत जबर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदरचा हल्ला का व कशासाठी केला याचा उलगडा अद्यापपर्यंत झालेला नाही. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कलम३२४प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर घटनेचे मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज असतानाही शिरूर पोलिसांकडून अदयाप आरोपी निष्पण होऊ शकले नाही. व कुठलाही तपास पोलीस यंत्रणा करू शकली नाही.
हॉटेलमधील रोख रक्कम लुटून नेली व जीवजाईपर्यत जबर मारहाण केली असताना फक्त ३२४ कलम लावण्यात आले आहे. नंतर फिर्यादीच्या तक्रारीनुसार दरोडा व ३०७ कलम न लावता ३२६ कलम लावण्यात आले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी निष्पण होत नसल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या दिवसाढवळया हाणामारीच्या प्रकारामुळे ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली आहे. पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे यांनी केली आहे.