चार शिक्षकांसह 32 विद्यार्थी उतरले होते पाण्यात ः वादळाने केला घात
पाण्यातील मौज मस्ती जिवावर बेतली
एनडीआरएफ पथकाच्या जाचक अटी
राजगुरूनगर – चासकमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयात बुडालेल्या 4 विद्यार्थ्यांची ओळख पटली असून मृतदेह त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. खेड पोलीस ठाण्यात या दुर्दैवी घटनेची नोंद झाली आहे.
परिक्षीत कुलदीप अगरवाल (वय 16, रा. दिल्ली), नव्या प्रज्ञेश भोसले (वय 16, रा. खारघर, नवी मुंबई), रितीन डी. धनशेखर (वय 16, रा. ईरोड तमिळनाडु), तनिशा हर्षद देसाई (वय 16, रा. बावधन) पुणे अशी बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबत विनायक अशोक शर्मा (वय 28, सह्याद्री स्कथल, के. एफ. आय. तिवाई हिल, गुंडाळवाडी वाडा रोड, राजगुरुनगर) यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली. गुरुवारी (दि. 19) सह्याद्री स्कूल या देशात अग्रणीय असलेल्या निवासी शाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीची परीक्षेचा शेवटचा पेपर होता.
या शाळेतील 34 मुलांनी पेपर संपल्यानंतर जेवण केले. त्यानंतर मुलांनी विनायक शर्मा, श्रीनिधी माहेशी, ओमना संतोष, जॉन्सी थॉमस यांना आमचा शेवटचा पेपर झाला असुन आम्ही एकमेकांचा निरोप घेणार आहोत. आम्ही आपापले घरी जाणार असलेने आपण स्कुलचे टेकडीचे खाली पाण्यात खेळायला जाऊ, अशी विनंती केली. संबंधित शिक्षक व 32 विद्यार्थी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शाळेजवळील टेकडीचे खाली असलेले चासकमान धरणाचे पाण्याचा फुगवटा असलेल्या पाण्यात मौज मस्ती करण्यासाठी गेले.
पाण्यामध्ये अंदाजे अर्धा तास विद्यार्थ्याची मौजमस्ती झाल्यानंतर अचानकपणे जोराचे वादळ येऊन पाण्याच्या जोराच्या लाटा तयार झाल्या. पाण्यात असलेले 34 विद्यार्थी व 3 शिक्षकांना आलेल्या लाटेमुळे पाण्यात ओढले. शिक्षकांनी प्रयत्न करुन 32 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थी बाहेर काढले. चौघे बेपत्ता झाल्याचे समजले.
यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांचा आरडाओरडा ऐकून जवळपासच्या शेतकऱ्यांनी व गावातील नागरिकांनी घटनस्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेतला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एका पाठोपाठ एक असे चार विद्यार्थी पाण्यात सापडले. त्यांना तात्काळ ऍम्बुलन्सने चाकण येथील खासगी हॉस्पिटलला दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले.
आपत्ती व्यवस्थापन कशासाठी?
खेड तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाचे नुकतेच चास कमान धरणाच्या जलाशयात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला; मात्र तालुक्यात हे पथक कार्यान्वित नाही. शासन फक्त प्रशिक्षणाचे धडे देते प्रत्यक्षात मात्र घटनास्थळी वेळेत मदत मिळत नाही. तालुक्यात पूर परिस्थिती, धरणे, तलाव, धरणाचे कालवे यात अनेकदा अनेक व्यक्ती बुडण्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र त्यांना वाचविण्यासाठी किंवा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पुण्याच्या एनडीआरएफ पथकाला पाचारण करावे लागते. हे पथक घटना घडल्यानंतर 5 तासानंतर पोहोचते, त्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे जीव वाचण्यापेक्षा मृतदेह बाहेर निघतात. एनडीआरएफचे एक पथक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असल्यास अशा घटना घडल्यास तात्काळ मदत मिळेल व अनेकांचे जीव वाचतील.