संजोक काळदंते
ओतूर -राज्यात जुन्नर हा ऐतिहासिक तालुका म्हणून एक विशेष ओळख आहे. वैभवशाली मानला गेलेल्या याच जुन्नर तालुक्यात मात्र काही समाज कंटकांनी जुन्नरच्या वैभवाला काळिमा फासण्याचे काम बेमालूमपणे सुरू केलेले आहे.
जुन्नर तालुक्यात असणाऱ्या पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक स्थळांना अशा काही विकृत मनोवृत्तीने ग्रासल्याचे चित्र निदर्शनास येते. गटागटाने दारूच्या पार्ट्या झोडत तेथील नैसर्गिक सौंदर्य नष्ट केले जात आहे. गड किल्यांवर रिकाम्या दारूच्या बाटल्या व कचऱ्याचे ढिग या गैर प्रकारांची साक्ष देत आहेत तसेच येथे मद्यधुंद विकृतांकडून इतरही गैर प्रकार वाढीस लागले आहेत. कोणी तक्रार केलीच तर यावर तात्पुरत्या स्वरूपात कायदेशीर कारवाई होते. तरीही या मुजोरपणे केलेल्या प्रकारांना आळा बसत नाही व त्यातूनच गंभीर गुन्हे घडण्यास चालना मिळत असल्याची बाब पुढे आली आहे.
हे तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी दुर्दैव मानले जात आहे. याच गंभीर प्रश्नासोबत जुन्नर तालुक्यात गाजणारा विषय म्हणजे अनधिकृत मद्यविक्री. अनेक ठिकाणी हॉटेल, ढाबे व इतरत्र खासगीत विदेशी मद्य विक्रीला उधाण आले आहे. त्यातून प्रेक्षणीय स्थळेदेखील सुटलेली नाहीत, परिणामी एखाद्या चांगल्या परिवाराला प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे मुश्किल झाले आहे.
ड्राय डे असताना तर मोठ्या प्रमाणात महागड्या दराने दारूची खुलेआम विक्री होते. अशा दामदुप्पट दरातील विक्रीला कोण लगाम घालणार? असा सवाल सामान्य लोक विचारू लागले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचेच निदर्शनास येत आहे. तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने अगदी सर्रासपणे मद्यविक्री होत आहे. पुणे – नाशिक व नगर- कल्याण महामार्ग तसेच प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे व तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील हॉटेल व ढाब्यांवर विनापरवाना विदेशी मद्य विक्री केली जात आहे.
यावर कधीही काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे विक्रेते अधिक बेभान झाले असून दादागिरीला आपसूकच खतपाणी मिळू लागले आहे. संबंधित विभागाने कायद्याचा बडगा वेळोवेळी उगारला असता तर संबंधित विनापरवाना दारू विक्रीचा व्यवसाय “जैसे थे’ राहिला नसता, असा आम जनतेत बोलबाला आहे. मग अशा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीवर कोणाचा आशीर्वाद कायम आहे हे तपासणे गरजेचे झाले आहे.
महामार्गालगत असणाऱ्या जवळ जवळ सर्वच हॉटेल मध्ये अगदी बेमालूमपणे सर्रास सर्व प्रकारची दारू विक्री होते; मात्र यावर संबंधित विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा का करीत आहे? हे एक प्रश्नचिन्हच आहे. झालीच तर फक्त दिखाऊ कार्यवाही करण्यात येते आणि कागदी घोडे रंगवले जातात; मात्र अशी कोणतीही परिस्थिती बदलली जात नाही हेही एक गुपितच आहे. तालुक्यातील जनता या सगळ्या प्रकाराला त्रस्त झाली आहे. अशा व्यवसायावर अनेक जण गब्बर व मुजोर झालेले आहेत त्यांना ना कोणाचे भय ना कोणाची भीती, थोडक्यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा अशा प्रकारावर अंकुश राहिलेला नाही. असे जनमत व्यक्त होत आहे.
देशी दारूच्या बाटल्या रिकाम्या करून रस्त्याकडेला बेफिकीरी फेकून दिल्या जात आहेत. यामुळे प्राणी मात्रला पादचाऱ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मद्यपी व विक्रेते कसलीही पर्वा न करता दारूच्या बाटल्यांचे ढिगारे रस्त्या कडेला लावत आहेत. यावर कोणीच कारवाई करणार नाही का, असा सवाल सध्यातरी सर्व सामान्य जनतेला पडत आहे.
आंदोलनाचा इशारा
आपली सामाजिक जबाबदारी समजून कोणी तक्रार दिली तर अशा व्यावसायिकाला आपल्या स्टाइलने तात्पुरत्या स्वरूपात झटका द्यायचा व तडजोडीच्या स्वरूपात प्रकरण मार्गी लावायचे अशी एकंदरीत परिस्थिती अगदीच गंभीर होत चालली आहे. अशा अनधिकृत मद्य विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सध्या जुन्नर तालुक्यातील स्थानिक जनता करीत आहे. जेणेकरून तालुक्याचे वैभव कुठेही कमी होणार नाही व कोणताही गैरप्रकार होणार नाही. तसेच यामुळे गुन्हेगारीला देखील मोठ्या प्रमाणात चाप बसेल. या प्रश्नाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा तालुक्यातील सामाजिक जनतेला न्याय देण्यासाठी सनदशीर मार्गाने मोठे आंदोलन उभारून रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा समाजसेवी संस्था व महिलावर्गाने दिला आहे.
वेळेचे नियम पायदळी…
महामार्ग व तालुक्यातील इतर सर्व महत्वाच्या ठिकाणी इच्छा होईल तेव्हा अत्यंत सुलभ रीतीने मिळणारे विनापरवाना देशी, विदेशी मद्य वाहनचालकांना घातकी ठरू लागले आहे. सुलभपणे उपलब्ध झालेले मद्य पिल्याने मद्यधुंद चालकांच्या गाड्यांचा वेग वाढून गंभीर अपघातांचेही प्रमाण वाढीस लागले आहे. सुलभ मद्य उपलब्धतेचा उलट परिणाम पाहता अलीकडच्या काळात अपघातातील बळींची संख्या तुलनेने चांगलीच बळावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच महामार्गावरील अनेक हॉटेल मालक, खाद्यपदार्थ व्यावसायिक वेळेचे कोणतेही नियम पाळीत नाहीत तर रात्री उशिरापर्यंत बिनधास्तपणे आपापले व्यवसाय सुरूच ठेवताना एका पाहणीत आढळून आले आहे.