रेडा -इंदापूर तालुक्यातील गोरगरीब कुटुंबांना अतिवृष्टीचा नुकसानकारक तडाखा बसला आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेव्हा मदत देईल तेव्हा देईल, मात्र आता मुलभूत गरजा भागवण्यासाठी निंतात गरज आहे. त्यामुळे गावा-गावातील नागरिकांना व नुकसानग्रस्त गावांना पंचायत समितीने मदत करण्याची भूमिका चोख बजवावी, असे आवाहन भाजप नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी स्वाती शेंडे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, दूधगंगाचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माजी सभापती विलास वाघमोडे, पुष्पा रेडके, करणसिंह घोलप, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, मंगेश पाटील, कैलास कदम, युवक नेते महेंद्र रेडके उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पुष्पा रेडके यांच्या कालावधीत अत्यंत चांगले काम पंचायत समितीच्या माध्यमातून झाले आहे. बापूराव शेंडे हाडाचा कार्यकर्ता आहे. मनापासून निष्ठा ठेवून जो कार्यकर्ता सामाजिक जाणिवेतून काम करत असतो. त्याला आज 100 टक्के फळ मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये सभापती पदाचा मान स्वाती शेंडे यांच्या माध्यमातून मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभापतिपदी स्वाती शेंडे
इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी मंगळवारी (दि. 20) झालेल्या निवडणुकीत काटी गणातील सदस्या स्वाती बापूराव शेंडे यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यामुळे पंचायत समितीवर हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. पुष्पा रेडके यांनी ठरल्याप्रमाणे सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.
यावेळी सत्ताधाऱ्याच्यावतीने स्वाती शेंडे यांनी तर विरोधी राष्ट्रवादीकडून शेटफळगढे गणाच्या सदस्या शीतल वनवे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी स्वातीत शेंडे यांना 8 तर शीतल वनवे यांना 5 मते मिळाल्याने सभापतीपदी शेंडे यांची बहुमताने निवड झाली.
हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब कुटुंबांना कशी मदत करता येईल. अधिकच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.-स्वाती शेंडे,सभापती, पंचायत समिती, इंदापूर