कारखान्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार
रमेश जाधव
रांजणी – चालू वर्षी उसाचा गळीत हंगाम लवकर सुरू होत आहे. मात्र सध्या साखर कारखानदारीची परिस्थिती पाहिली तर राज्यात लाखो टन साखर शिल्लक आहे. अशावेळी गाळप हंगाम लवकर सुरू करून काय साध्य होणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अशातच जनावरांच्या लम्पी प्रादुर्भावामुळे जनावरांच्या वाहतुकीला निर्बंध देखील घालण्यात आले आहेत. अशा अनेक अडथळ्यांची शर्यत साखर कारखान्यांना करावी लागणार असल्याने चालू वर्षीच उसाचा गळीत हंगाम आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे अधिक आहेत.
यंदाचा गळीत हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गेल्या वर्षी साखर कारखान्यांच्या क्षमतेपेक्षा जादा उसाचे गाळप करूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम राहिला होता. गेल्या वर्षी गाळप केलेल्या साखरेपैकी 60 लाख टन साखर राज्यात शिल्लक असल्याची माहिती सहकार क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेला साखरेचा साठा आणि नव्याने उत्पादित होणारी साखर याचे भविष्यात काय करायचे हा देखील प्रश्न साखर कारखानदारांसमोर उभा
ठाकणार आहे.
शेतकऱ्यांना खूश करण्याचे राजकारण
यंदा पुन्हा लवकरच गाळप हंगाम सुरू करून काय साध्य होणार आहे. केवळ शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना खूश करण्याचे राजकारण या निर्णयामध्ये आहे का, हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरू शकतो. नव्या हंगामातील साखरही अतिरिक्त ठरत असताना अगोदरच गाळप हंगाम सुरू करून खरोखरच साखरेच्या प्रश्न सुटणार आहे का?
लम्पीच्या प्रादूर्भावाचा परिणाम
यंदा लम्पी या संसर्गजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलांची किती उपलब्धता असेल हाही प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही. विशेष म्हणजे जनावरांना एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. अशावेळी उसाच्या बैलगाड्यांचे काय करायचे यावरही लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.
पावसाचा परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता
मागील वर्षी डिसेंबरपर्यंत पावसाने अडथळे आणल्यामुळे गाळप हंगाम लांबला होता. यंदाही परतीचा पाऊस लांबणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस लांबल्यास यंदाच्या गाळप हंगामालाही उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.