सचिन लंबाते : वाल्हे येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
वाल्हे – राज्यात मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी अनैसर्गिक युती करुन, महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. या सरकारचे लक्ष फक्त राज्यातील सत्ता टिकविणे आणि त्यातून आपले कसे भले होईल हा एकमेव कार्यक्रम राबवला आहे. यामुळेच या निवडणुकीत आघाडी सरकार विषयी आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. तीन पक्ष एकत्रित येऊनही भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत; नक्कीच हा निकाल महाविकास आघाडी सरकारची उलटी गणती सुरू झाली आहे, असे मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते यांनी व्यक्त केले.
राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानिमित्त, वाल्हे (ता.पुरंदर) येथे भाजपच्या वतीने एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड करत जल्लोष केला. तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि “देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो’ ची घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोदित करताना लंबाते बोलत होते. दरम्यान, मुख्य बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सचिन लंबाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष समदास राऊत, भाजपचे वाल्हे शहराध्यक्ष चंद्रकांत सासवडे, ग्रामपंचायत सदस्य कांतिलाल पवार, ऍड. सरला तिवारी, सचिन देशी, कुंडलिक पवार, राजेंद्र ढवळे, शैलेंद्र भोसले, सुनील राऊत, राजेंद्र सासवडे, राजेंद्र पवार, अनिल पवार आदी उपस्थित होते.