महाळुंगे पडवळ – ऐन हिवाळ्यात सुरघू असलेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व सकाळी पडणारे दाट धुके यांमुळे पिकांवरल रोगराईचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, चास, विठ्ठलवाडी, नांदूर, साकोरे, कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक आदी भागांतील शेतकरी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने सध्या कीटकनाशकांची फवारणीच्या कामात व्यस्त झालेले दिसत आहेत. सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे.
पर्यायाने रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. शेतकरी कांदे लागवड, बटाटा आणि कांदा काढणी, पिकांवर फवारणी, पाणी देणे या कामात व्यस्त आहेत. या परिसरात टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कांदा, शिमला मिरची या पिकांवर कीड, करपा, बोकड्या, आकसा, भुरी, मावा, तुडतुडे आदी रोग वाढले आहेत.
बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात आली आहेत. औषध फवारणी खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच फवारणी करावी लागत आहे.
– योगेश पडवळ, प्रगतशील शेतकरी, महाळुंगे पडवळ