राज्यमंत्री भरणे ः विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गाव हे शेवटचे गाव असले तरीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून विकास करण्यासाठी कधीही दुजाभाव केलेला नाही. आगामी काळात या गावातील अपेक्षित सर्व कामे मार्गी लावले जातील; मात्र विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी बोराटवाडी गावकऱ्यांनी रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
बोराटवाडी गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व नीरा नदीवरील पुलाचे भूमिपूजन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते रविवारी (दि. 15) पार पडले. यावेळी वाघजाई मंदिर परिसरामध्ये घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, प्रशांत पाटील, युवक नेते दीपक जाधव, रणजित घोगरे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले, बोराटवाडी गावातील व परिसरातील नागरिकांची व शेतकऱ्यांची नीरा नदी ओलांडून जाण्यासाठी, मोठी अडचण होती. गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी अनेक वेळा अद्ययावत पूल निर्माण व्हावा, यासाठी सातत्याने मागणी केली. इंदापूर तालुक्यात शेवटच्या टोकाचे गाव असले तरी नागरिकांना सुविधा कधीही अपुऱ्या पडू नयेत. यासाठी व माळशिरस तालुका तसेच इंदापूर तालुका या दोन्ही तालुक्यातील अंतर अवघ्या काही मिनिटांचे नव्या पुलामुळे निर्माण होणार आहे. बोराटवाडी गावकऱ्यांनी तोफांची सलामी देत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे यावेळी उत्स्फूर्त स्वागत केले.