इंदापूर तालुक्यातून ज्वारीचे पीक हद्दपार
नीलकंठ मोहिते
रेडा – इंदापूर तालुक्यामध्ये ज्वारीचे पीक मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जात होते, मात्र काही वर्षांपासून तालुक्यात फळबागांसह उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे तालुक्यातून ज्वारीचे पीक हद्दपार होऊ लागले आहे. ज्वारीचे पिक तालुक्यातून हद्दपार होत असल्यामुळे, भल्याभल्यांच्या जिभेला पाणी सुटणाऱ्या गावरानी हुरड्याची चव नव्या पिढीला चालता येत नाही. ज्वारीचे पीक कमी झाल्यामुळे, गरीबाची भाकरी श्रीमंताच्या ताटात गेली आहे.
जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुका हा बागायती तालुका जरी असला तरीदेखील, यामध्ये प्रामुख्याने पिक पद्धत बदलली आहे. निमगाव केतकी, बोरी, कळस, वरकुटे, काटी, सणसर, भवानीनगर, वालचंदनगर, बावडा भागात आता डाळींब तसेच केळी, द्राक्ष व इतर फळबागा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत.
उजनी जलाशय पट्यात ऊस क्षेत्र अधिक आहे. निरा नदी परीसरात तर उसाशिवाय कोणतेच पिक बघायला मिळत नाही. ज्या गावात शेतकऱ्यांना छोट्या आकाराची शेती आहे, ते शेतकरी भाजीपाला पिकवतात. दुभती जनावरे संभाळणारे शेतकरी मका, कडवळ, घास पिके घेतात. त्यामुळे ज्वारीसाठी बोटांवर मोजण्याइतकी शेती शिल्लक आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र अत्यंत नगण्य झाले आहे.
बाजारपेठेमध्ये ज्वारीचे बाजारभाव गगनाला भिडल्यामुळे गव्हाच्या किमतींच्या दुप्पट दराने ज्वारी खरेदी करून कशीतरी भाकरीचा आस्वाद घेता येतो आहे. पूर्वीच्या काळात इंदापूर तालुका ज्वारीचे आगार म्हणून प्रसिद्ध होता. गावरान ज्वारी शेतात आनंदाने डोलताना पाहायला मिळायची. मात्र हे चित्र आता इथून पुढच्या काळात पाहायला मिळत नाही.
आता तालुक्यात गहू व हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आहे. स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक कार्डधारकाला गहू मिळत असल्याने, गव्हाच्या पोळीवर शेतकरी नव्हे तर गरीब देखील, आपली भूक भागवत आहेत. ज्वारी कमी पाण्यामध्ये येणारे पीक आहे. इंदापूर तालुक्यात वनपरिक्षेत्र जास्त असल्यामुळे, शेतकरी ज्वारीचे पीक करण्यास धजावत नाहीत. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात या ज्वारीच्या पिकाला त्रास देऊन नासाडी करत असतात. ज्वारीच्या कमतरतेमुळे, ग्रामीण भागातील भाकरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे पाळीव जनावरांसाठी इतर तालुक्यातून चढ्या दराने कडबा विकत घ्यावा लागत आहे.
यंदा तालुक्यात हुर्डा पार्ट्यांना बसणार खीळ
तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागा व ऊस शेती केली आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक कमी प्रमाणात घेतले जात आहे. त्यामुळे आजी-आजोबाच्या काळातील हुरडा पार्ट्यांना खीळ बसणार आहे. तरीही याची चव घेण्यासाठी दुसऱ्या तालुक्यात जाऊन युवक व नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत.
गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानात तांदूळ, गहू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. शिवाय इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामात गव्हाची पेरणी मोठ्या क्षेत्रावर झाली आहे. त्यामुळे अनेकांचा कल गहू पिकाकडे गेलेला दिसत आहे. तरीदेखील गव्हाच्या दराच्या दुपटीने ज्वारी बाजारात विकली जात आहे.
-प्रा. कृष्णा ताटे, शेतकरी इंदापूर