* पुरंदर, बारामतीतील गावांच्या भूमिकेकडे लक्ष
* आता तरी टेकऑफ की थेट गाशाच गुंडाळणार?
* विरोध की राजकीय फायद्यासाठी जागा बदलाबदली?
पुणे/दिवे –पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमातळाच्या जागां अद्यापही निश्चित झालेल्या नाही. केवळ जागांबाबत घिरट्या सुरूच आहे. आता पुरंदर तालुक्यातून ते आता बारामती तालुक्याकडे सरकले आहे. पुरंदामधील पाच आणि बारामतीतील तीन अशा आठगावांमधून जमीन संपादित करून “टेकऑफ’चा घाट आता प्रशासनाने घातला आहे. पुरंदरमधून होणारा विरोध लक्षात घेत हे टेकऑफ बदलेल की केवळ राजकीय स्वार्थासाठी हा घाट घातला गेला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पुणे जिल्ह्याचा विस्तार आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झाल्याने जिल्ह्यात एकतरी आंतराराष्ट्रीय विमानतळ हवे यासाठी पहिले चाकण एमआयडीसीसाठी खेड तालुक्यात विमानतळ प्रस्तावित केले; पण टेकऑफला योग्य जागा नाही आणि विरोध यामुळे विमानतळाने खेड तालुक्यातून गाशा गुंडाळत ते पुरंदर तालुक्यात हलविल्याचे सांगण्यात आले.
पुरंदरमधील वनपुरी, उदाचीवाडी, उंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांतील जमीन संपादीत करण्याचे निश्चित करण्यात आली. पण स्थानिक प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी विरोध केल्याने पुन्हा सर्वेक्षण होत पुरंदरमधीलच रिसे, पिसे, राजुरी, पांडेश्वर, नायगाव, मावडी, पिंपरी या गावांकडे विमानतळ सरकले. या गावातून पुन्हा विरोध सुरू झाला आणि शेतकऱ्यांच्या संमतिशिवाय विमानतळ होणार नाही, असा शब्द आमदार संजय जगताप यांनी दिला.
त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होवू नये म्हणून सुवर्णमध्य काढत पुरंदमधील पाच आणि बारामतीतील तीन गावांमधील 3 हजार 68 हेक्टर क्षेत्रावर विमानतळा उभारता येवू शकते असा निर्वाळा देण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळ हळूहळू पुढे सरकू लागले असले तरी नेमके कारण विरोध की राजकारण हे स्पष्ट होत नसल्याने शेतकरी अद्यापही संभ्रमात आहे.
माजी मंत्री शिवतारेंचा आरोप खरा ठरणार?
पुरंदमधील पूर्वीची सात गावे बदलून नवीन सात गावे मध्यतरी प्रस्तावित करण्यात आले, त्यावेळीच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आवाज उठवत पुरंदर भकास करून बारामतीचा विकास साधत विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीत नेण्याचा घाट रचण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यातच आता बारामतीतील तीन गावांचा यात समावेश केल्याने त्यांच्या आरोपात तथ्य होते का, असा सवाल आता उपस्थित होता आहे.
जमिनींच्या भावांसाठी खेळ?
आंतरराष्ट्रीय विमातनतळ पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणार असे ठरताच प्रस्तावित विमातळाच्या जागेच्या आसपासच्या जमिनींना सोन्याचा भाव आला होता. मग पहिले ठिकाण नाकारल्यावर भाव खाली आले. आता पुन्हा तोच कित्ता गिरवला गेल्याने केवळ जमिनींच्या भाव वर चढवून त्या विकायच्या आणि टेकऑफ बदलले की जमिनींचे भाव धाडकन आपटले जातात, त्यामुळे केवळ जमिनींचे भाव वाढवायचे आणि पाडायचे यासाठीच जागा बदलण्याचा घाट घातला जातो आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
जिल्ह्यासाठी घातला का घाट?
बारामती वेगळा जिल्हा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक दिवसांपसून प्रयत्न सुरू आहे. आधूनमधून त्यास हवाही मिळत आहे. त्यातच बारामती वेगळा जिल्हा करण्यापूर्वी त्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ हवे आणि पुणे जिल्ह्यातून प्रकल्प वेगळ्या जिल्ह्यात जाऊन राजकीय वजन ढासळू नये म्हणून ही राजकीय खेळी खेळली का? तसेच आंतरराष्ट्रीय विमातनतळ झाल्यावर वेगळा जिल्हा करण्यास आणखी सोपे जाईल असा तर विचार केला नसेल ना, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
प्रशासन म्हणते नव्या जागेचे फायदे
* अगोदरपेक्षा जास्त जागा उपलब्ध होणार
* विमानांचे लॅंडिंग आणि टेक-ऑफ करताना अडथळा येणार नाही
* लोहगाव विमानतळावरील उड्डाणांना कोणतीही अडचण नाही
* अगोदरच्या जागेतील सात गावांतील बागायती क्षेत्र वाचणार
* जिराईत क्षेत्र असल्याने नुकसान कमी
* नव्याने विमानतळासाठी सुचविण्यात आलेली गावे
* भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द
* (अंदाजे क्षेत्र : 700 हेक्टर)
* रिसे, पिसे, पांडेश्वर, राजुरी आणि नायगाव
* (अंदाजे क्षेत्र : 2 हजार 368 हेक्टर)
* एकूण 3 हजार 68 हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी गरजेचे