राजुरी : जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचे हल्ले काही थांबता थांबेना राजुरी येथील शेतकरी शहानवाज पटेल यांच्या सात शेळ्या जागीच ठार झाल्या आहे. या परिसरातील दिल्ली, राजुरी, साकोरी, मंगरूळ, पारगाव, निमगाव सावा आदी परिसरात सातत्याने बिबट्याच्या हल्ल्यात पशुधन बळी पडत आहे. शुक्रवारी (दि. 7) राजुरी येथील तागडामळा शिवरातील शहानवाज युसूफ पटेल यांच्या घरासमोरील असलेल्या बंदिस्त गोठ्याची जाळी वाकवून पाहटेच्या सुमारास बिबट्याने बंदिस्त गोठ्याची तार वाकून आतमध्ये प्रवेश केला.
गोठ्यातील पाच गाभण शेळ्या, दोन मोठे बोकड जागीच ठार केले. शहानवाज पटेल यांनी सकाळी शेळ्यांचा आवाज येईना त्यानंतर शहनवाज यांनी गोठ्याचा दरवाजा उघडून पाहिला तर गोठ्यामध्ये सात शेळ्या मृतावस्थेत आढळल्या त्यानंतर गोठ्याकडे वरती पाहिले तर गोठ्याची चाळी वाकून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला यात सात शेळ्यांवर हल्ला करून ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागाच्या कर्मचार्यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी वनपाल अनिल, वनरक्षक त्रिंबक जगताप, स्वप्निल हाडवळे दाखल झाले, त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळ्यांचा पंचनामा केला. घटनास्थळी युवानेते वल्लभ शेळके, शाकीर चौगुले, निलेश हाडवळे, रंगनाथ औटी यांनी भेट दिली. दरम्यानच्या काळात मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहे.
वनविभागाने तातडीने पंचनामा करून नुस्कानभरपाई लवकरच शेतकर्याला मिळाली पाहिजे. तसेच बिबट्याच्या हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वल्लभ शेळके यांनी केली.