लोणी देवकर : बहुचर्चित उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. ११ एप्रिल २०१९ मध्ये घेतला होता. सदर आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मे २०२१ मध्ये रद्द केल्यामुळे इंदापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
इंदापूरला पाणी देण्याचा रद्द केलेला आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी इंदापूर ताुक्यातील लोणी देवकर येथे ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोखून धरला.
यावेळी बोलताना लोणी देवकर चे सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य कालिदास देवकर म्हणाले, इंदापूर तालुक्यातील ५३ गावांसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्र्यांनी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी मंजूर केले. परंतु सोलापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर दबाव आणून तो आदेश रद्द करून घेतला.
इंदापूरला पाणी मिळावे म्हणून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे पुन्हा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी संपूर्ण इंदापूर तालुका मंत्री भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यामुळे भरणे यांनी मी एकटाच पाण्यासाठी लढत आहे असे वाटून घेऊ नये. सर्व जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
आंदोलक शेतकऱ्यांनी काही काळ रस्ता रोको केला.त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णणे ठप्प झाली होती . यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. डी. धोत्रे यांच्यासह ५० पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
रास्ता रोको आंदोलनामध्ये कालिदास देवकर, सहदेव डोंगरे, कैलास तोंडे, अभिजीत गायकवाड, दिवाणराव देवकर, अमोल देवकर, भीमराव डोंगरे, भूषण तोंडे, हरिश्चंद्र चव्हाण, प्रकाश अभंग, शिवाजी थोरात,पांडुरंग गायकवाड, भारत तोंडे,विलास तोरवे, सागर तोंडे, दादा तोरवे, राजू घाडगे, यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जो पर्यंत आम्हाला पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करू आणि पाण्यासाठी लढा देऊ.”
कालिदास देवकर, लोणी देवकर ग्रामपंचायत सरपंच