सविंदणे -सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिशय मेहनतीने व कष्टाने उभी केलेली पिके पावसामुळे आडवी झाली आहेत. त्यामुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जीवन मरणाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे जोरदार पावसाने शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे.
खरीप हंगामात बाजरी, मूग, सोयाबीन, मका आदी पिकांची पेरणी केली. पिके जोमात आली पण न काढणीच्या वेळी पावसाने वाहून गेली. बाजरीची कणसे भिजली गेली. मूग काळे पडले. सोयाबीन पाण्यात सडत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. फळ पिकांमध्ये डाळिंब व सीताफळ बागेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सुरुवातीच्या काळात कांद्याला भाव 60 ते 70 रुपये प्रति दहा किलो होता.
आता जरी बाजारभाव वधारला असेल तरी वखारीमध्ये साठवून ठेवलेला केवळ 15 टक्के कांदा हवामानमुळे खराब होण्याच्या मार्गावर आहे.एकूण सर्व विचार करता बाजार वाढले असतील तरी माल शिल्लक नाही. रब्बी हंगाम कांदा लागवडीसाठी तयार केलेले कांदा रोप अतिवृष्टीमुळे खराब झाले आहे. थोडेफार शिल्लक असलेले कांद्याचे रोप लागवड करावी, तरी जमिनीत वाफसा नाही. सर्व बाजूंनी शेतकरी अडचणीत आला आहे.
कांदा बियाणे कोणाकडून घ्यायचे ठरले तर रुपये 3500 ते 4 हजार रुपये किलो या दराने विकत घेऊन सुद्धा उगवण क्षमता होईल की नाही यावर दुकानदार व कंपनीवाले कुठल्या प्रकारची गॅरंटी देत नाही. सध्या बाजारात बोगस कांदा बियाणांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. करोना संकट काळामध्ये काही शेतकरी फुल शेतीकडे वळाले. ते सुद्धा पीक पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहे.
दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर फुलांचे हक्काचे दोन रूपये मिळणार अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असली तरी तो पर्यंत निसर्ग साथ देईल की नाही हे सांगता येत नाही. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्व पक्षांनी सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू असा शब्द शेतकऱ्यांना दिला होता. अद्यापही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे फायदा झालेला नाही.
वास्तविक पाहता थकितवाल्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली. त्या शेतकऱ्यांना कमीत कमी 50 हजार रुपये व ज्या शेतकऱ्यांनी एक लाखाच्यावर कर्ज विकास सोसायटीकडून अथवा राष्ट्रीयकृत बॅंकेकडून घेतले आहे. त्या शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या पन्नास टक्के तरी रक्कम शेतकऱ्यांना विनाविलंब द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नियमितवाल्यांनी काय पाप केलंय
ज्यांनी चार ते पाच वर्षांपूर्वी कर्ज घेतले व थकले किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे भरता आले नाही. त्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले व त्यांना नव्याने कर्ज वाटप केले हे सरकारला चांगलं जमतंय तर नियमित वाल्यांनी काय पाप केले आहे, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
सर्व परिस्थितीचा विचार करता महसूल व कृषी विभागाने अतिवृष्टीमुळे ज्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्या सर्व पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर भरीव मदत करावी, पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी तालुका व जिल्हा पातळीवर सरकारने नेमून दिलेल्या कंपन्यांकडे शेतकऱ्यांची ऑनलाइन अर्ज करून विमा रक्कम जमा केलेली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा.
– बाळासाहेब पडवळ, प्रगतशील शेतकरी