रांजणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात यंदा कांद्याचे क्षेत्र वाढल्याचे चित्र पाहायला मिळते; मात्र मजुरांचा तुटवडा शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान कांद्याची रोपे उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तालुक्याच्या पूर्व भागात रांजणी, वळती, नागपूर, थोरांदळे, पारगाव शिंगवे या गावांमध्ये कांदा लागवडीला वेग आला आहे.
दरवर्षी कांदा लागवडी मोठ्या प्रमाणात या परिसरात होत असतात गतवर्षीच्या कांद्यांना बाजारभावाची चांगली साथ मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपये कांदा पिकाने मिळवून दिले. सध्या सर्वत्र कांद्याचा रोपांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे यंदादेखील कांदा भाव खाणार आहे. रांजणी, वळती परिसरात शेतकऱ्यांनी सर्वाधिक क्षेत्रात कांदा लागवड करण्यावर भर दिला आहे.
दरम्यान यंदा परतीच्या पावसाचा फटका कांदा रोपांना बसला आणि हीच कांदा रोपे उपलब्ध करण्यासाठी शेतकरी अन्य तालुक्यात दूरवर जाऊन खरेदी चढ्या भावाने करून कांदा लागवड करत आहे. कांद्याची रोपे अतिपावसामुळे नष्ट झाली असल्यामुळे आता तालुक्यात बहुतांशी शेतकऱ्यांकडे लागवडीसाठी कांदा रोपे शिल्लक नाहीत.
महागाचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतात रोपे टाकली होती; परंतु पावसामुळे रोपांच्या नुकसानीचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्याने शेतकरी समाधानी आहेत. अशा परिस्थितीत कांदा चांगल्या प्रकारे आर्थिक प्राप्ती करून देत असल्याने शेतकऱ्यांनी ऊस पिकाबरोबरच कांदा लागवडीलाही रब्बी हंगामात महत्त्व दिल्याचे पाहावयास मिळते.
रोपांसाठी वणवण
आंबेगावच्या पूर्व भागातील शेतकरी शिरूर, खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन कांदा रोपांची खरेदी करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. काही शेतकऱ्यांची कांदा रोपे वाचल्याने त्या शेतकऱ्यांनी आहे त्या रोपांमध्ये कांदा लागवड करण्यावर अधिक भर दिला आहे. एकूणच तालुक्याच्या पूर्व भागातील परिस्थिती पाहिली तर सध्या रब्बी हंगामात बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे चित्र पाहायला मिळते.