सलग तीन दिवसांपासून जोरदार पावसाची बॅटिंग : बाजरीचे पीक जमीनदोस्त
नुकसानभरपाईची मागणी : 70 टक्क्यांवर बाजरीची पेरणी
बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये मागील तीन दिवसांपासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील बाजरी, सोयाबीन, टोमॅटो त्यासोबतच इतर भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. बाजरी पीक अक्षरशः जमिनीवर झोपले असल्याने तालुक्यातील कृषी सृष्टी झोडपली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये चालू वर्षी 8680 हेक्टर बाजरीची पेरणी झाली होती. ती एकूण अंदाजे क्षेत्रापैकी 70 टक्के आहे. मागील वर्षीपेक्षा चालू वर्षी बाजरी पिकाची अधिक पेरणी झाली असल्यामुळे तालुक्यामध्ये बाजरीचे प्रमाण अधिक होते; मात्र पावसामुळे शेतामध्ये उभे असलेले पीक जमीनदोस्त झालेले आहे.
सध्या टोमॅटोचा प्रतिक्रेट 150 रुपये बाजार भाव आहे. पावसामुळे शेतामध्ये उभे असलेले चांगले पीक नष्ट झाले आहे, त्यामुळे समोर जाऊन येणारे अधिकचे उत्पन्न आता तुटपुंजे असणार आहे, त्यामुळे पुढील काळ कसा जाणार याबद्दल शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
पालेभाज्या सडण्यास सुरुवात
सध्या तालुक्यामध्ये कोथिंबीर, पालक, मेथी यासोबतच अनेक पालेभाज्या पिकांचे उत्पन्न घेतले गेले आहे तर या सलग पडणाऱ्या पावसामुळे व शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे ही पालेभाज्या पिके सडण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी ज्या पिकांच्या आशेवर बसला होता तीच पिके आता डोळ्यासमोर नेस्तनाबूत होत असलेली दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की कुणाच्या भरवशावर जगायचे हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
टोमॅटोवर बुरशीजन्य रोग
टोमॅटो पिकावरही मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने टोमॅटो पीक संपुष्टात आले आहे तर टोमॅटो पिकाचे बाजारभावही गडगडल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. अवेळी झालेला सलग भरमसाठ पाऊस आणि त्यात कमी झालेले बाजार भाव यामुळे शेतकऱ्यांच्या समोर अधिक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
विजेचे खांब कोसळले; दोन दिवस अंधारात
सलग झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोलमडले असल्याने गणरायाचे आगमनही अंधारात झाले असल्याचे पहावयास मिळते तर मंगळवार आणि बुधवारी पूर्ण दिवस वीज नसल्याने दुसरीकडे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे, त्यामुळे जनावरांसाठी लागणारे पाणी त्यांच्या खाद्यासाठी लागणारी कुट्टी या गोष्टी करण्यासाठीही आता शेतकऱ्यांना विद्युत महामंडळाची अडचण समोर आली आहे.
सीताफळ प्रति क्रेट 4 हजार रुपये
सासवड येथील बाजारपेठेमध्ये तुषार झेंडे यांच्या सीताफळास तब्बल 4 हजार रुपये प्रतिक्रेट बाजारभाव मिळाला असल्याने सीताफळ उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.