दिवे – पुरंदर तालुक्याला रविवारी (दि. 18) दुपारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्णत:मोडले आहे. तर पूर्व भागातील आंबळे, राजेवाडी, वाघापूर, गुरहोळी याभागात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून या भागातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.
परतीचा पावसाने पुरंदर तालुक्यात हाहाकार माजवला असून पावसाच्या नावाने ही आता थरकाप उडतो आहे. दरम्यान, आंबळे, राजेवाडी या भागात रविवारच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून शेतात पीकच दिसत नसून केवळ पाणीच दिसत असल्याने शेतांना अक्षरश:नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
भाजी व फळबागा भरपूर असून शेतात पाणी असल्याने भाजीपाला काढण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. बंधारे फुटल्याने गावाला जोडलेल्या रस्त्यावरून चार फुटांच्या उंचीवरून पाणी वाहत आहे.
ओढेही ओव्हर फ्लो झाले असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. घर, मंदिराच्या भिंतीही पडल्या आहेत. रस्त्यावर साधारण: तीन फूटापर्यंत पाणी वाहत आहे.