सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यात सहा सप्टेंबर रोजी ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. यामध्ये ऊस पिक भुईसपाट झाले तर बाजरी व कांदा बांधावर काढून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यानंतर महसूलच्या वतीने पंचनामे नोंद करण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात बारामती तालुका लॉकडाऊन करण्यात आला होता. दरम्यान, बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अर्ज करण्यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे मुर्टी येथील सतीश जगदाळे यांनी केली आहे.
बाधित शेतकऱ्यांना अर्जासोबत आधार कार्ड, बॅंक पासबुक, झेरॉक्स व मुख्य म्हणजे बाधित पिकाचे फोटो देण्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तालुक्याच्या पश्चिम भागात केवळ मोरगांव व सुपा हे बाजारपेठेचे मुख्य गाव असल्याने मोरगाव, तरडोली, मुर्टी, आंबी, जोगवडी, मोढवे, लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी परिसरात बाधित शेतकरी कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत.
(दि.22) पीक नुकसान भरपाईसाठी करावयाच्या अर्जाची मुदत संपली असल्याचे घोषित केलेले आहे.
मात्र, अनेक शेतकरी मिळणाऱ्या संभाव्य शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहेत. मूठभर शेतकऱ्यांना याचा केवळ लाभ मिळणार आहे. त्यामुळे तहसीलदार यांनी नुकसान भरपाई अर्जासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. अतिवृष्टीत ऊस, कांदा, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले होते. सध्या तालुक्यात वाढत असलेल्या करोना बाधितांमुळे लॉकडाऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही.