* इच्छुक पुन्हा जोमाने कामास
* आरक्षण सोडतीकडे लक्ष
नायगाव – नुकताच बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य करुन ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्याच्या सूचना केल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता लागलेला “ब्रेक’ निघून निवडणुकीची गाडी सुसाट सुटली असून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडती जाहीर केल्याने इच्छुकांनी पुन्हा जोमाने कामास सुरुवात केली असून सर्वपक्षांनीही मिनी विधानसभेवर लक्ष केंद्रीय केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लांबणीवर पडल्या होत्या. मागील आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. आरक्षण काय पडेल याची उत्सुकता असणाऱ्या इच्छुकांचा मात्र यावेळी हिरमोड झाला.
एकदाचे आरक्षणाचा तिढा सुटवा व निवडणुकीचा मार्ग मोकळा व्हावा, अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त केली जात होती. अखेर ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून आता इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे
लागल्या आहे.
खुल्या गटाला सर्वाधिक संधी?
पुणे जिल्ह्यात एकूण 82 गट व 164 गणाची निवडणूक पार पडणार आहे. यंदा बहुतेक गटात खुल्या वर्गाला संधी मिळणार असल्याचे भाकीत केले जात असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागतांना दिसत आहे. गट व गणामधील आरक्षण सोडतीनंतर खऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे कोणत्या गटात व गणात कुठले आरक्षण पडणार याकडे इच्छुक नजर लावून बसले आहे. सोशल मिडीयावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या असून आपआपल्या पक्षाची बाजू मांडतांना आधुनमधून शाब्दिक युद्धही रंगत आहे.
नाराज इच्छुकांवर करडी नजर
यंदाची निवडणूक ही अंत्यत चुरशीचीच होणार याचे संकेत यानिमित्ताने बघावयास मिळत आहे. सर्व पक्षीय कार्यकर्ते आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची विजयी घोडदौड रोखण्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे)गट प्रयत्न करणार हे मात्र निश्चित! दरम्यान, प्रत्येक गटामध्ये प्रत्येक पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराज इच्छुकांवर देखील करडी नजर राहणार आहे.
शिंदे गट म्हणून चर्चिला जाणार?
निवडणुकी दरम्यान नाराज गट तयार होवून तो गट शिंदे गट म्हणून तर चर्चिलज्ञ जाणार नाही ना? यावर देखील तर्कविर्तक लढवतांना दिसत आहे. गणापेक्षा गटाकडे इच्छुकांची संख्या लक्षवेधी असून मात्तबरांनी यावेळी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणावर गुलाल पडणार आणि कुणाची बत्ती गुल होणार याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
…मोट बांधण्यास सुरुवात
येणाऱ्या विधानसभेत आपल्याच पक्षाचा आमदार असावा, या अपेक्षेतून प्रत्येक पक्षाने मिनी विधानसभेवर आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यात कितपत यशस्वी होतील, ही येणारी वेळच सांगेल. 82 गटांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, यावर पक्षाचे अस्तित्व सिद्ध होणार असल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते जीवाची बाजी लावणार हे आजच्या घडामोडींवरुन सिद्ध होत आहे.