मनसे कार्यकर्त्यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
वाघोली – वाघोली गाव पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झाले आहे. परंतु पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंधरा अंगणवाड्या अद्याप महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. चार महिन्यांपासून अंगणवाड्यांचे वीजबिल जिल्हा परिषदेने भरलेले नसल्याने महावितरण प्रशासनाने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे हे वीजबिल त्वरीत भरावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ऐन उन्हाळ्यात लहान मुलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वेळोवेळी मुलांचे अंगणवाड्यांमध्ये वजन करणे आवश्यक असते. परंतु वीजपुरवठा खंडित केल्याने वजनकाटे देखील बंद पडले आहेत. त्यामुळे लहान मुलांचे अंगणवाड्यांमध्ये वजन करणे अशक्य आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. गणेश म्हस्के, प्रकाश जमदाडे, मंगेश सातव, राहुल बागल, दत्ता व्यवहारे, हितेश बोराडे, सुनील विटकर आदी उपस्थित होते.