जळगावचा ऊस तोडणी मजूर वाल्मिकी माळी याची संघर्षमय कहाणी
डोर्लेवाडी (वार्ताहर) – एक हात आणि एक पायाने अपंग असतानाही पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या वाल्मिकीने व्यंगावर मात केली आहे. आज तो धडधाकट माणसाप्रमाणे त्याचा कोयता फडात फिरत आहे. जळगावचा ऊसतोडणी मजूर वाल्मिकी माळी यांची ही कहाणी आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या फडात पिढ्यान्पिढ्याचे दारिद्रय आणि वर्षभराची पुंजी जमविण्यासाठी सहा महिन्यांची कुतरओढ करीत ऊस तोडणी मजूर राब राबतात. सध्या ारामती तालुक्यातील एका कारखान्यात वाल्मिकी हा ऊस तोडणीचे काम करीत आहे. तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा आहे. सध्या तो बारामतीत राहत आहे. वाल्मिकी लहानपणी आजारी पडल्यानंतर त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. वयाच्या पाचव्यावर्षी अंपगत्व आल्याने त्याचा एक हात आणि पाय जायंदी झाला.
काही दिवस आई-वडीलांनी त्याचा सांभाळ केला. त्यानंतर त्याच्या आईचे अकाली निधन झाले. त्याचा सांभाळ त्याचे मामा करीत आहेत. मायेचे छत्र हरविल्यानंतर तो पोरकाच झाला होता. मात्र, त्याच्या जिद्दीवर त्याच्या मामाने फुंकर घातली. त्याने ऊस तोडणीचा व्यवसाय हीच रोजीरोटी मानली आहे. तो सध्या इतर मजुरांच्या बरोबरीने काम करीत आहे. शासनाकडूनही मदत मिळावी, अशी अपेक्षा त्याच्या मामाने व्यक्त केली आहे.
वाल्मिकीने शिक्षण घेण्याच्या वयात कोयता हातात घेतला आहे. सध्या तो बावीस वर्षांचा आहे. 10 वर्षांपासून उसतोडणीचे काम करीत आहे. उसाच्या फडात धडधाकट लोक काम करतात. तितके काम वाल्मिकी करीत आहे.