राष्ट्रवादीचे पदाधिकारी आघाडीचा धर्म विसरले
भोर तालुक्यात भाजपाबरोबर युती कशी?
आम्ही भोर तालुक्यामध्ये 33 वर्ष सहकार जोपासला
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप तत्वहिन
भोर – राजगड सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी भोर तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार हे भाजपाला रोखण्यासाठी एकत्र सत्तेवर आले आहे. मात्र, भोर तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते भाजपाबरोबर युती करुन पक्षाच्या ध्येय धोरणांना मूठमाती देऊन व्यक्तीद्वेषातून तत्वहिन राजकारण करीत आहेत.
राष्ट्रवादीचे हे नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतः राजगड कारखान्याच्या निवडणुकीत न उतरता सामान्य कार्यकर्त्यांचा प्रपंच उध्दवस्त करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी केला. यावेळी थोपटे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टिकास्त्र सोडले.
राजगड कारखान्याच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामनिर्देशन पत्रावर जे निर्णय दिले. त्यावर विरोधी पक्षातील उमेदवारांनी अपील दाखल केले आहे. हा विषय न्यायप्रविष्ठ असताना राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेणे हा न्यायालयाचा अवमान आहे. त्याची सुनावणी होऊन आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. त्याचा निर्णय (दि.17) होणार असल्याची माहिती देण्यासाठी आमदार थोपटे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर चौफेर आणि मुद्देसूद टीकास्त्र सोडले.
यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार के. डी. सोनवणे, दिनकरराव धरपाळे, विकास कोंडे, शिवाजीराव कोंडे, पोपटराव सुके, सुभाष कोंढाळकर, सुरेखा निगडे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, उपसभापती रोहन बाठे, विठ्ठल कुडले, दत्तात्रय चव्हाण, संतोष सोंडकर उपस्थित होते. थोपटे म्हणाले की, राजगड कारखाना निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र फॉर्म भरणे दि.25 ते 29 एप्रिल या मुदतीमध्ये उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. विरोधकांना 17 जागांकरिता फक्त 15 उमेदवारी अर्ज भरता आले.
उमेदवार मिळण्याची वाणवा विरोधकांत होती. इच्छा नसताना काही उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला लावले. हे अर्ज भरताना सहकाराची माहिती न घेता उमेदवारी अर्ज भरले. त्यापैकी विरोधकांचे 13 उमेदवारी अर्ज अवैध झाले. तरी शेतकरी, ऊस उत्पादकांचा कळवळा आणण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. मुळात यातील काही नेते सभासद नाहीत.
काहींचा ऊसही नाही. केवळ व्देषातून कारखाना हिताचा पुळका आणून पत्रकार परिषद घेतली आहे. काही विरोधक हेतुपुरस्सर राजकारण करण्याचा प्रयल करीत आहेत. थोपटे म्हणाले की, विरोधकाला हे सांगणे आहे की, लोकशाही मार्गाने सामोरे जा, विरोधकांकडे कारखान्याबाबतच्या माहितीचा अभाव दिसत आहे. जिल्हा बॅंकेकडून राजगडला 4.26 कोटी रुपये येणे रक्कम असल्याने कारखान्याने शासनाच्या निर्णयाप्रमाणे ताळेबंद पत्रकात रक्कम येणे दर्शविली आहे. जिल्हा बॅंकेकडून कारखान्याला रक्कम येणे बाकी असताना संचालक मंडळ थकबाकीदार आहेत, हे म्हणणे अर्थहिन ठरत आहे.
भाजपच्या पॅनलमध्ये सहभागी होता
एखादी सहकारी संस्था उभारणी करणे व ती अखंडित सुरु ठेवणे याची जाणीव या पुढाऱ्यांना नाही. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना अशा तीन पक्षाचे सरकार आहे. परंतु भाजपाच्या चुकीची विचारधारा असलेल्या पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी शेतकरी व अखंड महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी हे सरकार स्थापन झाले आहे. असे असताना विरोधी पक्षातील मंडळी भाजप उमेदवाराच्या पॅनलमध्ये सहभाग घेतात, याचा अर्थ काय? यातून हे स्पष्ट होते की, ही मंडळी फक्त व्यक्तीव्देषातून विरोध करीत आहेत.