खोडद -सध्या कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असल्यामुळे सर्वसामान्य व गरीब जनतेच्या डोळ्यात पाणी आले आहे. कांद्याच्या वाढलेल्या भावामुळे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक कांद्याऐवजी कोबीचा वापर करू लागले आहेत. तर कांद्याचे भाव वाढल्याने कांदा चोरी वाढली आहे, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी रात्रीच्यावेळी कांदा चाळीचे राखण करीत आहेत.
चालू वर्षी पावसाने साथ दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती, परंतु सततच्या पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा पिके वाया गेली, तर अनेकांच्या चाळीतील कांदा सडून गेला. मागील महिन्यात 10 रुपये किलो मिळणारा कांदा अचानक 100 रुपयांवर जाऊन पोहोचला. सध्या तो 70 रुपये किलोपर्यंत आला असला तरी, सर्वसामान्यांना कांदा विकत घेणे आवाक्याबाहेर होऊन बसले आहे.
अनेक गृहिणींनी कांद्याचे भाव वाढतील या समजुतीने घरामध्ये 20 ते 25 किलो कांदा घेऊन साठविला होता; परंतु ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळे घरात साठविलेल्या कांद्याला सध्या मोड येऊ लागले असल्याने या परिसरातील महिला घरात साठविलेला कांदा निवडून उन्हात वाळत घालताना दिसत आहे.
दरम्यान, कांद्याचे भाव वाढल्यामुळे खोडद, मांजरवाडी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केलेली असल्याने हा कांदा बाजारात येण्यासाठी अजून 1 महिना अवधी असल्याने, सध्या तरी कांद्याचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्याना हा कांदा घेणे आवाक्याबाहेर ठरत आहे.