अस्मानी संकटांनी पुरंदर तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला
निखील जगताप
बेलसर – खरीप हंगाम संपून रब्बी हंगामास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी अनेक रोगांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कांदा पातींना पडलेला पीळ हा रोग सध्या तालुक्यातील बहुतांशी कांदा पिकावर दिसत आहे. प्रामुख्याने हवामानातील बदल, ढगाळ हवामान,रसशोषक किडींचा शिरकाव, लागवडी दरम्यान पावसाची हजेरी आणि लागवडीनंतर सलग पाऊस यामुळे कांदा पिकावर करपा सदृश रोगांचा आणि पातींना पीळ पडणे या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा पीक जमीनदोस्त झाले आहे. हा रोग हा बुरशीजन्य आहे.
बाजारामध्ये गुणवत्तापूर्ण कांद्यास 30 ते 40 रुपये बाजारभाव मिळत आहे. कांदा पिकाच्या चांगल्या बाजारभाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले असले तरी, सध्या कांदा हा पेरणी ते काढणी या अवस्थेत आहे; परंतु पिळ्याच्या आजाराने कांदा पिकास ग्रासले आहे. पिकाच्या अवशेषांमधून त्यासोबतच रोपवाटिकेद्वारे या रोगाचा प्रसार होतो. सुरूवातीला हा रोग ज्या जमिनीवर पाणी जास्त साचले जाते अशा ठिकाणी दिसून येतो. कांदा पिवळा पडणे व कांद्याच्या माना लांब होणे त्यासोबतच पाती वाकड्या होणे असे प्रकार झाल्याने कांदा पोसत नाही.
आकाराने लहान राहतो आणि सडण्याचे प्रमाण अधिक होते, त्यामुळे सखल भागात कांद्याच्या पिकावरील पीळ रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. कांदा पिकाच्या पातीवर सुरुवातीला पांढरे ठिपके दिसू लागतात आणि कांद्याच्या पातींचे शेंडे पिवळे पडतात.
रोगाची तीव्रता वाढल्यास कांद्याच्या पातींची मान लांब होते व कांदा पीळ पडून जमिनीवर पडतो. सतत पडणाऱ्या पावसामुळे किंवा मागील दोन वर्षे झालेल्या अतिपावसामुळे जमिनीमध्ये बुरशी निर्माण झाली आहेत त्यामुळे सर्वच पिकांना या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
…तर अटकाव शक्य नाही
पीळ रोगाचा शिरकाव जास्त प्रमाणात झाल्यास अटकाव करणे शक्य नाही. त्यामुळे रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
नियंत्रण कसे करावे?
पिकाची फेरपालट करावी,जुण्या पिकाचे अवशेष वेचून बाहेर काढावेत,रोपांची नर्सरी व लागवड गादी वाफ्यावर करावी,कार्बेन्डझियमची बीजप्रक्रीया करावी. दर दहा दिवसांनी बुरशी नाशकाची फवारणी करावी. व शेतात पाणी साचणार नाही याची दक्षता द्यावी. फ्लूओपायरम 17.7%+टेब्युकोनॅझोल 17.7% ची 0.5मीली प्रती लिटर फवारणी करावी किंवा हेक्झाकोनॅझोल बुरशीनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.