पुणे -तुमच्याकडे मदत द्यायला पैसे नसतील तर दोैरे काढण्याचा “शो’ कशासाठी? असा सवाल अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी विचारला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना मदत करणे गरजेचे असताना राज्याच्या अर्थमंत्र्यांनीच थेट हात “वर’ करीत केंद्राकडे बोट दाखवले आहे.
यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी करोनाने आपल्याकडे हातपाय पसरण्यास सुरूवात केली. त्यातच केंद्र सरकारने जीएसटीचा वाटा थकवला. उत्पन्नही कमालीचे घटले आहे. या संकटात अक्षरशः कर्ज काढून राज्याचा कारभार चालविण्याची वेळ आली आहे. राज्याच्या तिजोरी पैसाच उपलब्ध नसल्याने महापूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना अपेक्षित ती मदत तात्काळ तरी करणे शक्य नसल्याचे राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी एका पाहणी दौऱ्यादरम्यान स्पष्ट केले.
तरीदेखील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. 19) मंत्रालयात बैठक होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काय दिलासा देण्याबाबत निर्णय घेतले जाईल. यानंतर केंद्र सरकारकडे मदतीसाठी मागणी करणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
14 ऑक्टोबरला दिवसभर व रात्री झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा दिला आहे. याकाळीत जवळपास तीन दिवस झालेल्या पावसाने केवळ पिकेच नाही तर जमिनीही वाहून गेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र स्थानिक पातळीवर तलाठी, ग्रामसेवक यांना या आदेशाची स्पष्टता नसल्याने जाणवते. पंचनामे करायचे म्हटले तरी कशाचे करणार?
त्यामुळे पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता थेट मदत करा, अशी मागणी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला शेतकऱ्यांचे अश्रू पुसता येत नसतील तर आमच्या बांधावर येऊन आमच्या जखमेवरची खपली तरी काढू नका, अशा भावना व्यक्त करताना नुकसानग्रस्तांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे.
रब्बीची तयारी कशी करणार?
ऐन हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिसकावला आहे. यामध्ये खरिपाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे न करता थेट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. भरपाई मिळाली तरी ती तुटपुंजीच असेल. त्यामुळे या भरपाईबरोबरच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कुठल्याही अटींशिवाय कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.
नेतमंडळीचा दौरा
राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (सोमवार) सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांचा पाहणी दौरा करणार असून याची सुरुवात सोमवारी पुणे जिल्ह्यातून करणार आहेत. याचबरोबर आजी-माजी मंत्री लोकप्रतिनिधीदेखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करताना दिसत आहेत.
आमच्या भागात तरकारी पिकांसह सोयाबीन, भात पिके भुईसपाट झाली आहेत. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात आंबा, चिकू, सीताफळ आणि अंजीरबागांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाची तयारी करायचे म्हटले तरी पहिल्यांदा जमिनीची बांधबंदिस्ती, दुरुस्ती करावी लागणार आहे.
यातच मोठा खर्च होणार आहे. शेतकऱ्यांना सरकारने बी-बियाणे, खतांचा मोफत पुरवठा करावा. पंचनामे कागदोपत्री रंगविण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट एकरी किमान 50 हजार रुपयांची मदत करावी आणि खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज पूर्णतः माफ करावे, अशी आमची मागणी आहे.
-सतीश बाठे, शेतकरी केतकावळे, ता. पुरंदर