पुणे (राहुल गणगे) – आगामी महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच सहकारी संस्थामध्ये साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विकास सोसायट्या, तालुका खरेदी विक्री संघ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजप पक्षांमध्ये गावागावांत मेगाभरतीला उधाण आले आहे.
यामाध्यमातून सर्वच नेते पक्ष बळकटीसाठी जोर दिला जात आहे. यासाठी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी गावागावांत विविध आंदोलने, मोर्चे तसेच विकासकामांना हजेरी लावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पक्ष बळकटीसाठी आजी, माजी मंत्री, पदाधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून पायपीट करीत असल्याची चर्चा चौकाचौकांत रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली असून खडकवासला मतदार संघातील शिवगंगा खोऱ्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून महिला-युवती वर्गातही आपली पकड मजबूत केली आहे. गावागावांतील 20 महिलांना विविध पदांवर नियुक्ती पत्र देण्यात आली तर 180 महिलांना राष्ट्रवादीचे सदस्यत्व देण्यात आले.
शिवसेकडून जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियान दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात माजी खासदार तथा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे आयोजन केले जात आहे.
पंचायत समिती क्षेत्रात जिल्हा, उपजिल्हा व तालुखाप्रमुखांसह दौरा करून स्थानिक विभाग, उपविभाग, शाखाप्रमुख, युवासेना संघटकांची बैठक घेत. ज्या गावांत शिवसेना शाखा नाही तेथे शाखा सुरू करण्याचे तसेच महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या प्रत्येक भागात बैठका घेवून यानुसार जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. तसेच भाजपनेही जिल्हाभरात आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी तसेच आपले सरकार आणण्यासाठी विविध पदांच्या माध्यमातून कार्यकर्ते जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भेट झाली. ठाकरे यांच्या – कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत त्यांनी परप्रांतियांबाबतच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न त्यातून केल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मनसे व भाजप यांच्या युतीच्या चर्चेला उधाण आले होते. कुणी घरी ये म्हटल्यानंतर घरी जाणे ही आपली संस्कृती आहे. या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही. भेट राजकीय नव्हती. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते.असेही पाटील म्हणाले. या भेटीमुळे भाजप-मनसेची दिलजमाई होणार का? याबाबत राज्यात चर्चेला ऊत आला आहे.
“सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चाललेली विकास कामे, सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी आणलेल्या विविध योजना आणि उपक्रम यामुळे तरुण वर्ग भारतीय जनता पक्षाकडे वळत आहे. त्यामुळे पुढील काळात जनतेचे मत परिवर्तन होऊन भाजपला फायदा होण्यास मदत होणार आहे.”
-जयेश शिंदे, जिल्हाध्यक्ष भाजप कामगार आघाडी
“आगामी महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या, विकास सोसायट्या, तालुका खरेदी विक्री संघ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निष्ठावंतांना पक्षात प्रवेश देण्यात येत आहे. याचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे.”
– दिलीप वाल्हेकर, हवेली तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.