पेठ (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी ही महाराष्ट्रातील एक राजकीय आघाडी असून यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. या तीनही पक्षांच्या मित्रपक्षांचाही या आघाडीत समावेश आहे. महाविकास आघाडीच्या या सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे.
ह्या विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शपथ घेतली, त्या क्षणापासून पुढच्या पंधरा ते वीस वर्षासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलली आहे. मागच्या तीस वर्षापासून वैचारिक मुद्द्यांवर एकत्र असलेले शिवसेना व भाजप हे जुने मित्र कट्टर राजकीय शत्रू झाले व कट्टर शत्रू असलेले शिवसेना व राष्ट्रवादीकाँग्रेस हे मित्र झाले. त्यामुळे वर पासून तर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणापर्यंत या नवीन राजकीय समीकरणच उघड पाहायला मिळतो.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महाविकासआघाडी मध्ये काही ठिकाणी कुरबूर पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी महा विकास आघाडीचे मनोमिलन झालेले दिसून येत आहे. आंबेगाव तालुक्या मधील पेठ गावातअसेच महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन पेठ गावांमध्ये महा विकास आघाडीची स्थापना करून सामाजिक राजकीय एकोपाचे उदाहरण ठेवले आहे.
महा विकास आघाडीतर्फे सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष बबनराव धुमाळ तर शिवसेनेचे मयूर काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पेठ ग्रामपंचायत निवडणूक होऊन 13 पैकी 4 सदस्य बिनविरोध निवडून आले तर 9 उमेदवार प्रत्यक्ष निवडून आले. सरपंच पदासाठी दोघांचे अर्ज आले होते.यामध्ये संतोष बबनराव धुमाळ यांना 10 मते पडली तर अर्चना आनंथा बुट्टे यांना 3 मते मिळाली.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी योगेश खंदारे यांनी संतोष बबनराव धुमाळ यांची सरपंच पदी निवड झाल्याची घोषणा केली.
तर उपसरपंच पदी मयूर श्रीराम काळे यांची बिनविरोध निवड झाली.सरपंच संतोष धुमाळ हे यापूर्वी सलग 10 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते .व उपसरपंच म्हणून त्यांनी 8 वर्षे कामकाज पाहिले आहे.सरपंच संतोष धुमाळ व उपसरपंच मयूर काळे यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी खासदार तसेच शिवसेना उपनेते शिवाजी दादा आढळराव पाटील तसेच तालुक्याचे कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकासआघाडी कार्यरत राहील आणि जनतेच्या अपेक्षा उचावलेल्या अपेक्षा पुर्ण करेन.
– राम शेठ तोडकर (नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पेठ/अध्यक्ष वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ)
तालुक्यातील वरीष्ठ नेत्यांच्या सुचनेनुसार आणि कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्या आग्रहाखातर महविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात आलेला आहे.पेठ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांच्या उंचावलेल्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण केले जातील
– संतोष बबनराव धुमाळ (नवनिर्वाचित सरपंच पेठ ग्रामपंचायत)