भक्त पुंडलिक मंदिर दर्शनासाठी बंद : जलपर्णी गेली वाहून
आळंदी – मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूरआला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे. नदीत पोहण्याचा हट्ट न करण्याचे आळंदीपालिकेच्या प्रशासनाने आवाहन केले आहे.
आळंदी व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाचे आगमन झाले असून आता तो अहोरात्र बरसत आहे. त्यामुळे गेली चार महिने कोरडी ठाक पडलेली इंद्रायणी नदी आज पहाटेपासून ओसंढुन वाहू लागली आहे. दुपारी खऱ्या अर्थाने इंद्रायणीने काट सोडला असून पाणी पातळीत सतत वाढवताना दिसत आहे. कोल्हापूर पद्धतीचा असणारा बंधारा देखील ओसंडून वाहू लागला आहे त्यामुळे वरील धरणात गेली अनेक दिवसांपासून साचलेली जलपर्णीही वाहून गेली आहे.
पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने पुंडलिक मंदिर भाविकांच्या दर्शनास बंद झाले असून भक्तीसोपान पुलावरून पाणी जात असल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. किनाऱ्याजवळून जातांना नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सूचना नगरपालिकेने दिल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा रस्ते आणि भक्तीसोपान पूल वापरास तात्पुरता बंद झाला आहे. इंद्रायणी नदीवरील पाचही पुलांवर थांबल्यानंतर इंद्रायणीला आलेला पूर पाहता येत असल्याने नदीचे दुतर्फाविहंगम दृष्य नेत्रात साठविण्यास भाविक जमत आहेत.
माऊली मंदिर आणि इंद्रायणी नदीघाट वैभव, तसेचश्री ज्ञानेश्वरी मंदिर, विश्वरूपदर्शन मंच, गरुडस्तंभ परिसरातील नागरिकांचे प्रवाशांचे लक्ष वेधत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी पुलावर वाहने थांबवून वाहनचालक देखीलदिसत होते. इंद्रायणी नदीवरील भक्त पुंडलिकाच्या मंदिरासह भागीरथी कुंडात पुराचे पाणी साचले आहे. यामुळे भागीरथी कुंडही पाण्यात गेले आहे.
सतर्कतेचा इशारा
नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी आपापल्या विद्युत मोटारी काढून घ्याव्यात, असेही आवाहनही करण्यात आले आहे.