सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याने कार्यकर्त्यांची धावपळ
भाऊ ठाकूर
राहू- अनेक दिवस करोना काळामुळे लांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर सरकारने मोकळा केला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या कार्यकर्त्यांचा अखेर जीवात जीव आला आहे.
दौंड तालुका तसा पाहिला तर सहकारी संस्थांच्या बाबतीत जास्त सेन्सेटिव्ह समजला जातो; कारण दौंड तालुका हा पूर्ण बागायती असल्यामुळे विविध कार्यकारी संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. त्या मुळे दौंड मध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकांना अनन्य साधारण महत्व आहे. या निवडणुकांवर अनेक जणांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
दौंड मध्ये 1 सहकारी साखर कारखाना, 1 खरेदी विक्री संघ, 1 कृषी उत्पन्न बाजार समिती तरी 124 सहकारी संस्था (सोसायटी) आहेत. यामध्ये खरेदी विक्री संघ, जिल्हा बॅंक, कृषी उत्पन्न बाजार समिती व काही विविध कार्यकारी संस्था या माजी आमदार रमेश थोरात यांच्या ताब्यात आहेत. तर भीमा पाटस सहकारी कारखाना हा आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात आहे.
यामध्ये जिल्हा बॅंकेसारख्या महत्वाच्या सहकारी संस्थेवर माजी आमदार रमेश थोरात यांचे मागील 30 ते 35 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. तसेच खरेदी विक्री संघावरदेखील अनेक वर्षांपासून माजी आमदार रमेश थोरात यांच्याच ताब्यात आहेत. तसेच अनेक विविध कार्यकारी संस्थावर देखील वर्चस्व आहे. कारण ज्याच्या ताब्यात जास्त विविध कार्यकारी सहकारी संस्था त्याचे जिल्हा बॅंकेवर वर्चस्व असते.
त्यामुळे प्रथमपासूनच रमेश थोरतांचे वर्चस्व राहिलेले आहे. तसेच भीमा सहकारी साखर कारखाना हा गेले 20 वर्षांपासून आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आज तरी सहकार क्षेत्रात माजी आमदार रमेश थोरात यांचा दबदबा असलेला दिसून येतो. हा दबदबा मोडीत काढण्यासाठी आमदार राहुल कुल कार्यकर्त्यांना ताकद देऊन कसे डावपेच आखतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल. आताही आपले वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही बाजूकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जाणार, यात काही शंका नाही.
दरम्यान, तिसऱ्या लाटेचा किती परिणाम जाणवतो याच्यावर देखील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. तसेच रद्द झालेले ओबीसीचे राजकीय आरक्षणाचा किती प्रभाव /परिणाम या निवडणुकांमध्ये जाणवतो, हे पाहणे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सहकार चळवळ मोडीत काढून त्यावर खासगी साम्राज्य उभे करणे ही जी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसची प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी भ्रष्ट राजकारण्यांच्या हातून शेतकरी व सहकार वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही पूर्ण ताकदीने सहकारातील प्रत्येक संस्थेची निवडणूक समाजातील चांगल्या व्यक्तींना बरोबर घेऊन लढणार आहे.
-वासुदेव (नाना) काळे, प्रदेश अध्यक्ष, किसान मोर्चा-भारतीय जनता पार्टी
भविष्यातील कोणत्याही निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी पूर्ण आहे. त्या नुसार प्रत्येक गटात मेळावे, चर्चासत्र आयोजित करून कार्यकर्त्यांची मते, जाणून घेतली आहेत. सहकारी संस्था असो की जिल्हा परिषद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कधीही तयार आहे. पक्षाकडून जे आदेश येतील त्यानुसार पुढील वाटचाल केली जाईल.
-आप्पासाहेब पवार, अध्यक्ष, दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
“भीमा पाटस’चे भवितव्य सभासदांच्या हाती
मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा बॅंकेने कारखान्याला दिलेल्या जप्तीच्या नोटिशीमुळे वातावरण तापून विषय चौकशी लावण्यापर्यंत गेला होता. भीमा पाटस कारखाना चालू करण्यावरून दोन्ही नेत्यांकडून अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने दौंडचे राजकारण काही काळ तापले होते. विद्यमान अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार कारखाना बंद पडण्यामागे पूर्वीचा काळ कारणीभूत आहे.
आमच्याकडून ज्यावेळी कारखाना विद्यमान अध्यक्ष यांच्या ताब्यात दिला तेव्हा तो शिलकीत होता; परंतु कारखाना चुकीच्या पद्धतीने चालविल्यामुळे आज बंद पडण्याची परिस्थिती आली आहे. भविष्यात कारखाना चालू होणे कठीण आहे. असे माजी आमदारांचे म्हणणे आहे. तर अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार कारखान्याची चौकशी लावायची असेल तर ती पहिल्यापासून लावा, तर माजी आमदारांच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, उलट चौकशीमुळे दूध का दूध व पाणी का पाणी होईल. यामुळे भीमा पाटस कारखान्याची निवडणुकीत सभासद काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.