आमदार अशोक पवार ः घोडगंगा साखर कारखान्याचे गव्हाणपूजन
वडगाव रासाई – साखरेचे दर केंद्राने वाढवले तर साखर धंद्याला नक्कीच चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केली.
न्हावरे (ता. शिरूर) येथील घोडगंगा कारखान्याच्या 30 व्या गळीत हंगामाचे गव्हाणपूजन आज मंगळवारी (दि. 12) अध्यक्ष आमदार अशोक पवार, उपाध्यक्ष ऍड. रंगनाथ थोरात तसेच आशासेविका, अंगणवाडी कर्मचारी व आजी माजी संचालकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी पवार बोलत होते. आमदार पवार म्हणाले, अनेक अडचणींवर मात करत कारखाना आगामी गाळपासाठी सज्ज झाला आहे.
कारखान्याने सुमारे 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. ऊस तोडणी व गाळपाचे नियोजन केले आहे. नोंद झालेल्या सर्व उसाचे गाळप करण्यात येणार आहे. सभासद व बिगर सभासदांच्या सुमारे साडे आठ लाख मेट्रीक टन ऊसाची नोंद कारखान्याकडे झाली आहे. उस उत्पादकानी संपूर्ण ऊस घोडगंगेला गाळपासाठी द्यावा.
कारखान्याचा वीज करार वेळेत न झाल्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागला असला तरी त्यावर पर्याय काढून सुस्थितीत कारखाना सुरु झाला आहे. शेतकरी हाच कारखान्याचा मालक असून त्यांनी आपला उस प्राधान्याने द्यावा. यावेळी पर्यवेक्षिका रंजना वाघमारे, मनिषा माळवे, सुनिता कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, प्रतिभा बोत्रे, महादेव मचाले, मनिषा सोनवणे आदींची भाषणे झाली.
यावेळी कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, दिलीप मोकाशी, कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे, राम नागवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव कोरेकर, राजेंद्र नरवडे, वाल्मिक नागवडे, पंडित दरेकर, राज्य बॅंकेचे अधिकारी जाधव, सुदाम साठे, नरेंद्र माने, सुभाष कळसकर, संतोष रणदिवे, सागरराजे निंबाळकर, प्रशांत होळकर, सचिन मचाले, शिवाजी कदम आदी उपस्थित होते. यावेळी स्वागत उपाध्यक्ष ऍड. रंगनाथ थोरात, सूत्रसंचालन मंगेश ढवळे तर बाबासाहेब फराटे यांनी आभार मानले.