आरक्षणासह तयारीवर पुन्हा फिरले पाणी
ऐन उन्हाळ्यात वातावरण थंडच
कुल, थोरात गटाभोवती फिरतंय तालुक्याचे राजकारण
दोन गट वाढल्यामुळे परिसरातील गटाची फेररचना
विशाल धुमाळ
दौंड – ओबीसी आरक्षणामुळे लांबलेल्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. निवडणुका लवकरच होणार या आशेवर गेल्या काही महिन्यांपासून थंडावलेले राजकीय वातावरण दौंड तालुक्यात हळूहळू तापू लागले होते. त्यातच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने ओबीसींच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या पुणे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक कार्यरत आहे. ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या प्रभागरचना लवकरच जाहीर होणार असून सन 2022 ते सन 2027 या कालावधीसाठी दौंड तालुक्यातून आठ जिल्हा परिषद गट जाहीर केले आहेत. मागील निवडणुकीतसहा गट होते. मात्र, या वेळी दोन गट वाढल्यामुळे गटाची फेररचना झाली आहे. अनेक गावे आता वेगळ्या गटात जाणार आहेत. दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाची संख्या आहे.
प्रामुख्याने माळी व धनगर या दोन समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून ओबीसी समाजातील मातब्बर नेतेमंडळी या निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहेत. परंतु, जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी असलेला आरक्षणाचा दोर न्यायालयाने कापल्यामुळे इच्छुकांची नामुष्की झाली आहे.
दौंड तालुक्यात प्रामुख्याने पक्षापेक्षा व्यक्तिप्रिय मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. दौंड तालुक्याचे राजकारण कुल व थोरात या दोन्ही नेत्यांच्या भोवती फिरत आहे. ओबीसी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता दोन्ही नेतेमंडळी सर्वसाधारण जागेवर ओबीसी समाजातील जो निवडून येऊ शकतो, असा निकष लावून माळी किंवा धनगर समाजाला उमेदवारी देऊ शकतात. मात्र, हक्काचे आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजात मोठी नाराजी आहे. सन 2011च्या जणगणनेनुसार तालुक्यात 30 ते 40 टक्के ओबीसी समाज आहे. त्यानुसार एक ते सव्वा लाख लोकसंख्या ही ओबीसींची आहे.
तालुक्यात राहु – खामगाव, केडगाव – बोरीपार्धी, रावणगाव – खडकी या गटांमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे. या गटामधुन कुल आणि थोरात गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत आता आरक्षण रद्द झाल्याने या इच्छुकांना संधी देऊन सन्मान होतोय की त्यांचा हिरमोड होतोय ? हे आता पावसाळ्यानंतर होणाऱ्या निवडणूकीतच स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीवर मात्र करडी नजर…
आम आदमी पार्टी आता दौंड नगरपरिषद निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यात आगामी निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी व आम आदमी पार्टीमध्ये रणधुमाळी होण्याची शक्यता आहे. निवडणुका पावसाळ्यापूर्वी होऊद्या किंवा पावसाळ्यानंतर होऊद्या, असे म्हणत सर्वपक्षीयांनी तालुक्यात आपली मोर्चेबांधणीची मोहीम मात्र अविरत सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. सध्या सोसायटी निवडणुकांची धामधूम सगळीकडेच सुरू आहे. या निवडणुकीतून वंचित राहिलेल्यांनी आता नाहीतर पुढे बघू म्हणत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर इच्छुकांनी मात्र करडी नजर ठेवली आहे.