पुणे -सध्या पदवीच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन होत आहे. यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना दिले आहेत. करोना संकट लक्षात घेता परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असेही उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना सूचित केले आहे.
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक चार दिवसांपूर्वी झाली. त्या बैठकीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अंतिम वर्ष परीक्षेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित विचारात घ्यावे. त्यानुसार आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात यावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना परिपत्रकाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा योग्य पद्धतीने पुरविण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, अंतिम वर्ष परीक्षांच्या नियोजनाबाबत गठीत केलेल्या डॉ. पेडणेकर समितीने सादर केलेला अहवाल शासनाने स्वीकारला आहे. यातदेखील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधांसह त्यांना सोयीच्या पडतील अशा पद्धतीने परीक्षांचे नियोजन करावे, अशी शिफारस केली, असे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले आहे.