चिंबळी -खेडच्या दक्षिण भागातील बळीराजाने खरीप हंगामात घेतलेले भुईमूग पीक जोमात आले होते, मात्र ऐन तोडणीच्या वेळी पाऊस आल्याने काढणी रखडली आहे.
पिकात पाणी साचल्याने शेंगांना मोड येण्यास सुरुवात झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. चिंबळी, कुरूळी, मोई आदी परिसरातील शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी खरीप हंगामातील भुईमूग पिकाची पेरणी केली.
यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने व पोषक वातावरण मिळाल्याने पीक जोमदार झाले. त्यामुळे यंदा उत्पादन वाढेल या आशेवर बळीराजा पिकाची काळजी घेत होता.
मात्र, ऐन तोडणीच्या वेळी दमदार पाऊस झाल्याने काढणी रखडली असून पाऊस न थांबल्याने पिकांत पाणी साचले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असून केलेला खर्चही वाया जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.