इंदापूरमध्ये गांधीगिरी : लवकरच आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
रेडा – इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी महावितरणने ताबडतोब बंद करावी, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांनी डॉ. शिशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली पेढे भरवून गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करीत निवेदन दिले.
इंदापूर शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने जमले होते. कोणालाही काहीही न बोलता, महावितरणच्या कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना पेढे भरवले. यावेळी सर्व अधिकारी आवक झाले. यानंतर शेतकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी शेतकरी अप्पासाहेब माने, लक्ष्मणराव देवकाते, बापूसाहेब पारेकर, सुहास गोटे, संतोष जाधव, शिवराज गावडे, अण्णासाहेब तरंगे, सिताराम जानकर, नितीन गोफणे, दादा माने आदी शेतकरी उपस्थित होते.
डॉ. तरंगे म्हणाले की, शेतकऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली असताना, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. त्यांना आधार देणे अपेक्षित आहे. त्यांच्या कोणत्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. लवकर वीज तोड थांबवावी; अन्यथा तालुक्यातील शेतकरी उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तरंगे यांनी दिला.