राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ः जनता केलेल्या चांगल्या कामाची नोंद घेते
इंदापूर – महाविकास आघाडी सरकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळेच इंदापूर तालुक्यामध्ये विकास कामांसाठी निधी अधिकचा मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका गावोगावी विकासाची गंगा पोचवण्याची असल्यामुळे, तालुक्यातील जनता केलेल्या चांगल्या कामाची नोंद घेते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील काटी येथे नवीन उभारणी करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाचे उद्घाटन तसेच 20 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व काटी- रेडा- रेडणी रस्त्याकरिता 3 कोटी निधीचा रस्ता, वरकुटे- काटी- नीरा भीमा सहकारी साखर कारखाना रस्ता- 6 कोटी 11 लाख, तसेच काटी ओढ्यावरील 1 कोटी रकमेच्या पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस काटी यांनी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते सोमेश्वर वाघमोडे, साहेबराव मोहिते, हेमंत वाघमोडे, प्रकाश राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, पंचायत समिती माजी सभापती प्रशांतराव पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ, दत्तात्रेय घोगरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, काटी गावच्या सरपंच रेखा मरगळ, विकास सोसायटीचे चेअरमन भीमराव शेळके,
नवनाथ वाघमोडे, राजेंद्र राऊत, विपुल वाघमोडे, वैभव वाघमोडे, अमित मोहिते, शिवाजी बनसोडे, डॉ. अमोल गोरे, नंदकुमार सोलनकर, दादासाहेब भोसले, बाळासाहेब लोखंडे, दिलिप मोहिते, विलास यादव, वैभव यादव, पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक गावच्या सरपंच रेखाताई मरगळ यांनी केले, तर विपुल वाघमोडे यांनी आभार मानले.
22 गावांना हक्काचे पाणी देणार
इंदापूर तालुक्यातील गावा – गावातील विकास विरोधकांना देखवत नसेल तर, ज्या मार्गाने आम्ही निघालो आहोत. त्या मार्गावर काटे तरी टाकू नका अशी विनंती विरोधकांना राज्यमंत्री भरणे यांनी केली. तालुक्यातील 22 गावातील दुष्काळी शेतीला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. तालुक्यातील विरोधकांना कोणत्याही विकासासाठी 10 रुपयेदेखील देता येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुकीच्या थापांना नागरिकांनी बळी पडू नये.