आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग
तुकाराम कतुरे
मलठण – दौंड तालुक्यात अनेकांचे लक्ष लागून राहिलेल्या देऊळगाव राजे – लिंगाळी गटातील भाजप – राष्ट्रवादी पक्षातील इच्छुकांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी निवडणुकीत भाजप – राष्ट्रवादीचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषद गटात लिंगाळी, मलठण ही गावे प्रामुख्याने सामाविष्ट होती. त्यातील मलठण गणातील मलठण, वाटलुज, नायगाव ही गावे कमी झाली आहेत. तसेच लिंगाळी गणातील दौंड शहरालगत असलेले गोपाळवाडी हे गाव या गणातून कमी झाले आहे. आता नव्याने लिंगाळी व देऊळगाव राजे हा गट तयार झाला आहे.
देऊळगाव राजे हा गण नव्याने निर्माण झाल्याने या भागातील इच्छुकांच्या सोयीचा झाला आहे. देऊळगाव राजे हे गाव दौंड तालुक्यातील पूर्व भागातील मध्यवर्ती व बाजारपेठेचे गाव आहे. या परिसरातील जनतेचा दररोज या गावाशी संपर्क होतो. न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. या सर्वांचा अंदाज घेऊन सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते इच्छुक उमेदवार कामाला लागल्याचे दिसून येत आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, वर्षश्राद्ध, दशक्रिया विधी अशा विविध कार्यक्रमांतून नेतेमंडळींची गर्दी जमवत आहे. या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडीचा आणखी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची डोकेदुखी होणार आहे.
आघाडीच्या कार्यकर्त्यांची या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. लिंगाळी व देऊळगाव राजे गटात या अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. सहाजिकच इच्छुकांची गर्दी या पक्षामध्ये होणार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये याउलट परिस्थिती आहे. पक्ष जो उमेदवार देईल तोच अंतिम होणार आहे. या निवडणुकांमध्ये वरील प्रमुख पक्षांनी प्रमाणेच स्वाभिमानी शेतकरी संघटना व वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार रिंगणात उतरण्याच्या विचारात आहे. तालुक्यात जरी कुल थोरात गट प्रभावी असले तरी इतर पक्ष व अपक्ष डोकं वर काढतील यात शंका नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लिंगाळी, मलठण गटामध्ये रस्ते, पाणी, वीज, बांधकाम अशा पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. त्याचबरोबर शेतीच्या सिंचनासाठी विविध ठिकाणी बंधारे बांधले आहेत. अनेक ग्रामपंचायतींना कार्यालये बांधून पेयजल योजना मार्गी लावल्या आहेत. अशा पद्धतीने सर्वांगीन विकासकामांच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
– वीरधवल जगदाळे, जिल्हा परिषद माजी सदस्य
राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत केलेली कर्जमाफी व करोना काळात केलेली दमदार कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध योजनांमार्फत केलेली कामांच्या जोरावर पक्षाच्या आदेशानुसार आगामी निवडणुकीसाठी रणांगणात उतरणार आहे.
– शरद सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक बारामती लोकसभा मतदारसंघ
आमदार राहुल कुल व किसान मोर्चाचे राज्याध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आमदार राहुल कुल यांनी तालुक्यात केलेली विकासकामांमुळे भाजपला यश नक्कीच मिळणार आहे. याऊलट महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी खंडित केलेली शेतीपंपची वीज, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, उजनी धरणातील पाणी वाटपाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत गाजणार आहेत.
– अभिमन्यू गिरमकर, तालुकाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा