सणसवाडी पाझर तलावासह विहिरीदेखील कोरड्या
शिक्रापूर – चासकमान कालव्यासाठी ज्या गावांतील शेतकरी व गावच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना चासकमानचे पाणी मिळणे आवश्यक असतानादेखील सणसवाडीकर हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत.
येथे 1962 मध्ये शासनाच्या रोजगार हमी योजनेतून तलाव बांधण्यात आलेला असून, या तलावांतर्गत तब्बल साठ विहिरी आहेत. त्या माध्यमातून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतींचे सिंचन होते, तर जवळच नागरिकांना पाणीपुरवठा करणारी सहकारी पाणी वाटप संस्था आहे. सणसवाडीतील शेकडो एकर जमिनी चासकमान प्रकल्पासाठी संपादित झालेल्या आहेत.
त्यामुळे येथील ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळा वाढत असल्याने गावात पाणीटंचाई वाढली असून, शेतकऱ्यांची पिके जळून चालली आहेत. त्यामुळे येथील तलावाला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे यांसह ग्रामस्थांनी कालवा विभागाकडे केली आहे.
सणसवाडी ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी पाण्याची मागणी करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी दोन दिवसांत मागणी केली असून, सध्या धरणात फक्त दहा टक्के पाणीसाठा असल्याने आता कोणालाही पाणी देणे शक्य नाही.
महेंद्र गायकवाड, चासकमान विभाग, शाखा अभियंता