ओला दुष्काळ जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी
मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगफुटीजन्य मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे आणि वसंतराव भालेराव यांनी केली आहे .
पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. तरकारी पिके पाण्याखाली गेल्याने सध्याचा हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामध्ये होऊ लागली आहे. पावसामुळे शेतीचे बांध फुटून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तरकारी पिके, कांदा, बटाटा, आले, टोमॅटो, वांगी, मेथी,कोथिंबीर यांसारखी बहुतांशी पिके शेतातच सडून गेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाचे दुटप्पी धोरण यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे, अशी माहिती सरपंच राजश्री भालेराव आणि उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी दिली.
सध्याची शेती ही भांडवली शेती झाली आहे. या परिस्थितीत खते, मजुरी, फवारणी, वाहतूक खर्च हे मोठ्या प्रमाणावर महागला आहे. त्यात निसर्गाचे अस्मानी संकट शेतकऱ्यांना नेहमीच सतावते. या परिस्थितीने शेतकरी मेटाकुटीस आल्याने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
– प्रमोद कानडे, सदस्य, माजी जिल्हा परिषद