पुणे – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 3 नवीन कृषी कायद्यास विरोध करण्यासाठी व सध्या दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शवण्यासाठी, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा/ ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन शनिवारी यवत ते उरुळी कांचन येथे करण्यात आले.
पुरंदर हवेलीचे आमदार श्री संजय जगताप, माजी खासदार अशोक मोहोळ, प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, नंदुकाका जगताप, पृथ्वीराज पाटील, नंदू चौधरी, सत्यशील शेरकर, स्वप्नील सावंत, कौस्तुभ गुजर, लहू निवांगुणे, विठ्ठल खराडे, दिनेश सरताळे व अनेक शेतकरी व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्च्यात सहभागी होते.
१५ किलोमीटर च्या रॅलीत अनेक शेतकरी स्वतः आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी होत गेले. ३ किलोमीटर पर्यंत रॅलीची रांग होऊनदेखील, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून शांततामय मार्गाने, महामार्गची कोंडी न करता व कोविड च्या नियमांचे संपूर्ण पालन करून रॅली संपन्न झाली.
मोर्च्याची सांगता उरुळी कांचन येथे झाली. प्रसंगी आमदार संजय जगताप ह्यांनी “शेतकरी विरोधी हे कायदे रद्द करण्यात यावे व मोदी सरकाने अहंकारी वृत्ती सोडून आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याची हेटाळणी व अपमान न करता त्वरित कायदे मागे घ्यावेत.
कृषिप्रधान भारत देशात शेतकरी/ किसान ला अतिरेकी/ नक्षलवादी आणि गद्दार ठरवण्यासाठी आटोकाट नियोजनबद्ध प्रयत्न सोशल मीडिया वर चालवला जात आहे. पूर्वी विरोधी पक्षांना त्यांच मत मांडण्याची संधी दिली जात असे व त्यावरती सविस्तर चर्चा केली जात असे.
मोदी सरकारच्या काळात कोणत्याही प्रकारची चर्चा न करता बिल पास केले जाते, व विरोधी पक्षाला बोलायची किंवा विरोध करायची संसदेत संधी देखील दिली गेली नाही” असे त्यांनी संबोधले. प्रसंगी अशोक मोहोळ, देविदास भन्साळी, रत्नाकर महाजन ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेश ढमढेरे व आभार नंदुकाका जगतापांनी केले.