40 गावांत राष्ट्रवादीचे वर्चस्व
रेडा -इंदापूर तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराच्या 40 ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामावर तालुक्यातील जनतेचा विश्वास आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारसरणीतून इंदापूर तालुक्यामध्ये कामकाज सुरू आहे. प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या विविध योजनेचा निधी पोहोचलेला आहे. इंदापूर तालुक्यातील विरोधक हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. चुकीच्या बातम्या पसरवू लागले आहेत.
साठ ग्रामपंचायतीपैकी तब्बल 40 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व झाले आहे. दोन ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. गावातील रस्ते पिण्याचे पाणी वीज या मूलभूत सुविधा प्रत्येक गावाला दिल्या जातील. त्यामुळे तालुक्यातील कोणताही नागरिक, विरोधकांच्या भूलथापांना कधीही फसत नाही, असा टोला भरणे यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे सातत्याने लक्ष इंदापूर तालुक्यावर आहे. त्यामुळष तालुका पुणे जिल्ह्यामध्ये विकासकामात पुढे राहिला आहे.दळणवळणासाठी महत्त्वाचे समजले जाणारे रस्ते अद्ययावत होत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांचा उपेक्षित असलेला पाणीप्रश्न मार्गी लागत आहे.
38 ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता
रेडा -इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीमध्ये 60 पैकी 38 ग्रामपंचायतीवर भाजपचेच निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले असल्याची माहिती माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीमध्ये बहुमताने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. निवडीत भाजपचे सर्वाधिक 38 सरपंच व उपसरपंच झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील जनतेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्पष्ट विरोधी कौल दिला आहे. भाजपच्या बाजूने चांडगाव, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, निरगुडे, भिगवण, कुंभारगाव, भादलवाडी, निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्वर, सराफवाडी, व्याहळी, वरकुटे खुर्द, हगारवाडी, गोतंडी, निमसाखर, वालचंदनगर, कळंब, सरडेवाडी, गलांडवाडी नं.1, गलांडवाडी नं. 2, बाभुळगाव, गोंदी, भांडगाव, नृसिंहपूर, टणू, भोडणी, कचरवाडी (बावडा), पिठेवाडी, निंबोडी, तावशी, जाधववाडी, रेडा, कचरवाडी (निमगाव) अशा 38 ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच, उपसरपंच झाले आहेत.
तर चार ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र चित्र आहे तर उर्वरित ग्रामपंचायती विरोधकांकडे गेल्या आहेत. भाजपलाच जनादेश मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नेटाने काम करून तालुक्यामध्ये भाजपच्या विचारांची ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता आणली. त्याबद्दल या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनापासूनचे मी आभार मानतो.