ओतूर – जुन्नर तालुक्यात उत्तर व पश्चिम विभागात गेले चार दिवस संततधार पावसामुळे ओढे पहिल्यांदाच भरून वाहत आहेत. मांडवी नदीच्या उगमक्षेत्रात भरपूर पाऊस झाल्याने चिल्हेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून व भिंतीवरून पाणी वाहत आहे.
या पाण्यामुळे मांडवी नदी दुथडी भरून वाहते आहे. चिल्हेवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 0.90 टीएमसी इतकी आहे. मांडवी नदी चिल्हेवाडी, आंबेगव्हाण, रोहोकडी, ओतूर, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे खुर्द, ओझर (गणपतीचे) या गावूाहून शेवटी कुकडी नदीला मिळते.
दरम्यान ओतूरच्या उत्तर पश्चिम पट्ट्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभुळशी, काठेवाडी, माळवाडी, कुडाळवाडी आदी गवात गेले चार दिवसांत संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे या विभागातील भातखाचरांचे बांध फुटले आहेत.
काही ठिकाणी जोमात असणारे भात पिक वाहून गेले आहेत हाता तोंडाशी आलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
आंबेगव्हाण, रोहोकडी येथे पावसामुळे भाजी पाला व नवीन लागवड केलेल्या टॉंमेटो पिकांचे नुकसान झाले आहे. असे रोहोकडीचे शेतकरी पोपट घोलप यांनी सांगितले.
डोमेवाडी येथील शेतकरी बबनराव भोरे म्हणाले, या विभागात काकडी, फ्लॉवर व भाजीपाला पाणी साठल्यामुळे नुकसान झाले आहे.
उदापूर परिसरात या पावसामुळे नवीन लागवड केलेल्या टॉमेटो व ज्यांची तोडणी चालू होती. तसेच काकडी, भाजीपाला यांचे नुकसान तर सोयाबीनला पोषक आहे, असे प्रगतीशील शेतकरी राहुल शिंदे म्हणाले.