पुरंदर- ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यामुळे गट-तट, नातेसंबंधांचे हित जोपण्यासाठी कोणाला संधी द्यावी, ज्येष्ठ, तरुणांचा कसा मेळ बांधयचा तर आरक्षणानुसार सरपंचपदावर कोणाची वर्णी लावावी यासाठी पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये घोंगडी बैठकींचा जोर वाढला आहे.
ग्रामपंचायतीनिहाय (सरपंचपदाचे आरक्षण) पुढीलप्रमाणे; जवळार्जुन (सर्वसाधारण), मावडी कडेपठार (सर्वसाधारण स्री), नाझरे सुपे (सर्वसाधारण), नाझरे कडेपठार (मागास प्रवर्ग स्त्री) या पद्धतीने आरक्षण पडल्यामुळे या ग्रामपंचायतमधील काही कार्यकर्त्यांमध्ये निराशा तर काही कार्यकर्ते अतिशय उत्साहाने कामाला लागले आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटली की सत्ता हस्तगत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जातत त्याचीही चर्चा या घोंगडी बैठकांद्वारे रंगताना दिसत आहे. पांडेश्वर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मागील वर्षी माणिकराव झेंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरीनाथ सोनवणे, संजय जगताप, प्रकाश शिंदे यांच्या पॅनलने सत्ता मिळवली होती. तर यंदा कोणत्या पॅनलची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
वेगवेगळ्या पक्षीय आघाड्या?
पुरंदर तालुक्यातील सत्तेची गणित पाहताना जिल्हा परिषद राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या तर पुरंदर पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात आहे, त्यामुळे गावाच्या राजकारणामध्ये आघाडी होणार का? त्याचबरोबर तरुणांना कितपर्यंत संधी मिळणार? याकडे लक्ष लागलेले आहे. काही ठिकाणी तर तरुणांचा वेगळा गट स्थापन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस त्याचबरोबर काही ठिकाणी शिवसेना या पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या आघाडी होण्याची शक्यता आहे.