परिंचे – काळदरी (ता. पुरंदर) परिसरातील बांदलवाडी, रामवाडी, कोंडकेवाडी परिसरात ढगफुटीमुळे भात शेतीबरोबर रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने या परिसराची पाहणी केली असून, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सरपंच गणेश जगताप यांनी केली असून जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शिवसेना नेते हरिभाऊ लोळे यांनी या परिसराची पाहणी केली आहे.
गुरुवारी (दि. 4) रात्री साडेसात वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली तब्बल तीन तास या ठिकाणी एकसारखा पाऊस पडत होता. रात्रीची वेळ असल्याने रुद्र रूप धारण केलेल्या पावसाचे गांभीर्य समजले नाही; पण एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बांदलवाडी परिसरात नुकत्याच भात लागणी झाल्या आहेत.
75 टक्के क्षेत्रावरील लागणी पूर्ण झाल्या असून उर्वरित भात लागण्याची कामे वेगात सुरू होती. भात रोपांवर किड व बुरशीचा प्रादूर्भाव झाल्यामुळे भात रोपे जळाली आहेत. रोपांची टंचाई भासत असताना शेतकऱ्यांनी मिळेल तेथून मिळेल त्या किंमतीने भात रोपांची खरेदी करून केली; मात्र ढगफुटीच्या संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
या परिसरात करण्यात नव्याने रस्ते करण्यात आले असून अती पावसाने अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत काही ठिकाणी रस्ते खचले आहेत शासनाच्या वतीने मंडल कृषी अधिकारी संजय फडतरे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रोहिदास साबळे, तलाठी बजरंग सोनवले, कृषी परिवेक्षक संदिप कदम, ग्रामसेवक संजय पारधी यांच्या पथकाने या परिसराची पाहणी केली आहे. यावेळी शिवाजी पेटकर, बाळासो बांदल, अनिल जाधव, संपत जाधव, सुनील जांभळे, शिवाजी वाघमारे, विजय मिसाळ, संजय कोंडके, मोहन कोंडके, विजय जानकर, लक्ष्मण जानकर आदी शेतकरी उपस्थित होते.
पंचनामे सुरू
ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करून पंचनामे सुरू करण्यात आले असल्याचे मंडल कृषी अधिकारी संजय फडतरे यांनी सांगितले. तीव्र उताराच्या भात खाचरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले.
तीन तास या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला डोंगरावरून कधी नव्हे; एवढे पाणी शेत जमिनीत शिरल्याने बांध, दगडी ताली फुटून भातशेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या असून भाताची रोपे गाडली गेली आहेत.
-स्वागत कोंढाळकर, शेतकरी