दोन्ही धरणात सरासरी 30 ते 33 टक्के पाणीसाठा
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणात पावसाळा सुरु होण्याआधी धरणात 30 ते 33 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यंदा काही वर्षांच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा होता. मात्र, पाण्याचा वापर जादा झाल्याने दोन्ही धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे.
भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता 23.75 टीएमसी आहे. सद्य स्थितीत (दि. 15) धरणात 33.38 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
भाटघर धरणातून 607. 74 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. हिरडस मावळ खोऱ्यात असणाऱ्या नीरा देवघर धरणाची पाणी साठवण क्षमता 12.91 असून सध्या धरणात 30.32 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच या धरणातून 646.80 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. पाण्याचा वापर अजून दीड महिने काटकसरीने करण्याची गरज आहे.
नीरा नदीत विसर्ग
भाटघर धरणातून महामार्गालगतच्या पूर्वेकडील गावांना नीरा नदीपात्रातून पाणी मिळते. यामध्ये सारोळा, राजापूर, भांबवडे, पांडे आदी गावांना या पाण्याचा लाभ होतो. त्यानंतर बारामती, फलटण तालुक्यातील गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. तर नीरा देवघर धरणातून नीरा नदीकाठावरील भोर तालुक्यातील आपटी, नांदगाव, पिसावरे, आंबेघर, शिरवलीमार्गे महामार्गालगतच्या पूर्व भागातील गावांना पाणीपुरवठा होत आहे. त्यानंतर हे पाणी वीर धरणात सोडले जाते.
दीड महिने पाणीसाठ्यात घट होणार
भाटघर धरणात मार्चमध्ये 79.20 टक्के पाणीसाठा होता. नीरा देवघर धरणात मार्चमध्ये 67.65 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर गेल्या अडीच महिन्यात यातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी निम्मे पाणी पिण्याचे पाणी, शेतीसाठी सोडले आहे. त्यामुळे आता दोन्ही धरणात सरासरी 30 टक्के पाणीसाठा राहिला आहे. यात अजून एक महिना पाणी वापर होणार आहे. पावसाळ्याची सुरूवात जुलैमध्ये होत असल्याने दीड महिना हा पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची वेळ संबंधित प्रशासनावर आली आहे.