1077 क्यूसेकने विसर्ग ः धरणात 98 टक्के पाणीसाठा
शिंदे वासुली (वार्ताहर) – भामा आसखेड (ता. खेड) धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन (दि. 21) दुपारी बारा वाजल्यापासून सोडण्यात आले. रब्बी हंगाम 2020-21 करिता हे आवर्तन असून 1077 क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
सध्या धरणात 98.58 टक्के इतका पाणीसाठा असून मागील वर्षी आजच्या दिवशी धरणात 99.36 टक्के पाणीसाठा होता. सुरुवातीला पावसाच्या कमी प्रमाणामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरण उशिरा भरले होते. धरणाच्या एक आणि तीन क्रमांकाच्या दरवाजातून पाणी सोडण्यात आले असून, त्यासाठी दरवाजे 10 सेंमीने उचलण्यात आले आहेत. खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला पाण्याचा फायदा होत आहे. 1 जूनपासून धरणात 1034 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी इतकी असून धरणात सध्या जिवंत पाणीसाठा 7.55 टीएमसी इतका आहे.
खेड तालुक्यातील आठ बंधारे भरण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे, असे असले तरी नेहमीप्रमाणे शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा बंधाऱ्यापर्यंत नदीच्या प्रवाहाद्वारे या आवर्तनाचे पाणी जाणार आहे. हे आवर्तन सुमारे 12-15 दिवस चालू असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळून शेतीसाठी लाभदायक आहे. नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने शाखा अधिकारी बी. आर. खेडकर आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक के. डी. पांडे यांनी केले आहे.
पुणे, पिंपरीला पाणी दिले तर…
धरण प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी नदीला पाणी सोडले; परंतु पुढील काळात पुणे, पिंपरी-चिंचवड, आळंदी शहरांना पाणीपुरवठा सुरू झाला तर धरणातील पाणीसाठा किती काळ टिकेल. कदाचित शेतीसाठी पाणी मिळणार नसल्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर भामाआसखेड धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा होता अशी हळहळ व्यक्त केली.