अणे पठारावरील शेतकऱ्यांचा येडगाव धरणावर आजपासून ठिय्या
चार ग्रामपंचायतींचा मतदानावर बहिष्कार
उपसा सिंचन योजनेच्या मागणीला कायम केराची टोपली
बेल्हे : आणे पठारावरील शेतकऱ्यांचे येडगाव धरणावर सोमवारी (दि. 22) भव्य असे ठिय्या आंदोलन असून पठारावरील शेतकरी हक्काच्या पाण्यासाठी पेटून उठले आहेत.आंदोलनाची सर्व तयारी झाली असून आंदोलनासाठी पठारभागावरील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पठार विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले. तर अणे पठारच्या चारही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
अणे पठारावरील सर्व ग्रामपंचायतींनी 2006 पासून वेळोवळी ग्रामसभेचे ठराव घेवून या भागासाठी उपसा सिंचन योजना राबवावी अशी मागणी सातत्याने केली आहे. कुकडी प्रकल्पाची दुसरी सु.प्र.मा. (सुधारित प्रशासकीय मान्यता) 1993 मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाण्याचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगत 2018 मध्ये कुकडी प्रकल्पात पाणीच शिल्लक नाही असे मोघम उत्तर देत तिसऱ्या सु.प्र.मा.च्या दिशेने पाऊले टाकीत असताना तहानलेल्या अणेपठारची मात्र कायमच उपेक्षा केली जात होती.
2018 च्या दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर स्व.घमाजी शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेल्या अणेपठार विकास संस्थेने जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 2023 मध्ये कुकडीच्या चौथ्या सु.प्र.मा.त अणे पठारचा समावेश व्हावा यासाठी पठारवासियांनी मतदानावर बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले.
अणे पठारावरील नळवणे-शिंदेवाडी-पेमदरा-आणे ग्रामस्थांनी आपल्या एकजूटीतून संविधानाने दिलेला हक्क नाकारत प्रशासनाला जाग आणण्यासाठी सोमवारपासून कुकडी नदीवरील येडगाव धरणावर ठिय्या आंदोलनास सर्व पक्षीय नेते मंडळांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अणेपठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते यांनी केले.
…तर 10 हजार हेक्टर ओलिताखाली
उपसासिंचनाने पाणी उपलब्ध करून दिल्यास अणे पठारावरील सुमारे 10 हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येवून तरुणांच्या हाती रोजगार येईल तसेच केंद्र शासनाच्या नैसर्गिक शेती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होऊन विषमुक्त शेतमाल या पठारावर पिकविला जाईल. काळ्याआईची सेवा करणाऱ्या बळीराजाच्या दारात खऱ्या अर्थाने सुखसमृद्धी येईल, असे आमच्या मागच्या पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येईल, अशा भावना शिंदेवाडी गावचे तरुण सरपंच अजित शिंदे यांनी व्यक्त केल्या.
आमच्या अणे पठाराचा कुकडी प्रकल्पात समावेश करून सर्वेक्षणाचे काम तातडीने हाती घ्यावे.
– बाळासाहेब गगे, अध्यक्ष, कुलस्वामी खंडेराया ट्रस्ट
जलसंपदा खात्याने कुकडीचे पाणी उपसासिंचनाने पठारावर आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व यासाठी हरितऊर्जा प्रकल्पांच्या उभारणी करण्यात यावी.
– बाळासाहेब दाते, अध्यक्ष, भारतीय किसान संघ, जुन्नर तालुका